• Sat. Mar 7th, 2026
    शिवसृष्टीसाठी राज्य सरकार देणार ५० कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

    Devendra Fadnavis: मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असे आम्ही तिघे मावळे आहोत. एकनाथ शिंदे हे छत्रपतींना मानणारे आहेत. अजितदादा पुण्याचे आहेत. शिवसृष्टीच्या निर्मितीसाठी महायुती सरकार काही कमी पडू देणार नाही, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    महाराष्ट्र टाइम्स
    fadnavis new shisrusti

    म.टा.प्रतिनिधी, पुणे: ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा खजिना मोठा केला; पण तो स्वत:साठी वापरला नाही म्हणून ते श्रीमंतयोगी होते,’ असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त राजकारण्यांना बुधवारी दिला. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या महाराजांच्या त्रिसूत्रीवर उभा राहिलेली शिवसृष्टी पाहून मी नि:शब्द झालो आहे. हे राष्ट्रकार्य लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारतर्फे ५० कोटींचा निधी देण्यात येईल,’ अशी घोषणा त्यांनी केली.

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवजयंतीदिनी झाले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, अमृत पुरंदरे, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. डॉ. अजित आपटे यांनी सूत्रसंचालन केले. विनीत कुबेर यांनी आभार मानले.
    एका व्यक्तीमुळे ठाण्यात पक्ष कमकुवत, अनेकजण पक्ष सोडून गेले; अजित पवार यांची नाव न घेता आव्हाडांवर टीका
    ‘अनेक देशांतील संग्रहालये पाहिली; पण येथील भाव वेगळा आहे. राज्य सरकारने शिवसृष्टीला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असला तरी ते अभ्यास आणि प्रेरणेचे केंद्र आहे. महाराजांचे हे जिवंत स्मारक आहे,’ असे गौरवोद्वगार काढून फडणवीस म्हणाले, शिवरायांनी अरबी आणि फारसीमधील राज्यकारभार बंद करून मराठीला राज्यभाषेचा दर्जा दिला. पर्यायी मराठी शब्द लिहायला लावले. त्या प्रकारची नवीन आज्ञावली त्यांनी तयार केली.’

    ‘लोकांपर्यंत इतिहास पोहचला नाही. इतिहास जाणणारी आणि देश प्रेम असलेली पिढी निर्माण होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. आपण वारसा विसरलो होतो. शिवाजी महाराजांनी आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढले,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
    मनातली विकृती कार्यक्रमात उफाळून बाहेर; सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला फटकारले
    दरम्यान, येथील गंगासागर तलावात राजगड, प्रतापगड, सिंहगड आणि घोडेस्वारांनी रायगडाहून आणलेले पाणी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथून पाठविलेल्या पाण्याचा कलश, तुळापूर त्रिवेणी संगमावरील पाणी आणि नर्मदा नदीचे पाणी यावेळी गंगासागरात अर्पण करण्यात आले. गंगासागर तलाव आणि प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

    दोन मावळ्यांची दांडी
    ‘मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असे आम्ही तिघे मावळे आहोत. एकनाथ शिंदे हे छत्रपतींना मानणारे आहेत. अजितदादा पुण्याचे आहेत. शिवसृष्टीच्या निर्मितीसाठी महायुती सरकार काही कमी पडू देणार नाही,’ अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, अन्य दोघा मावळ्यांचे नाव पत्रिकेत असतानाही त्यांनी दांडी का मारली, अशी चर्चा यावेळी रंगली होती.

    शिवराय जगातील उत्तम योद्धे, रणनितीकार आणि प्रशासक होते. त्यांच्या काळात कायदा सुव्यवस्था चोख होती. महिला सुरक्षित होत्या. जात किंवा स्थानाच्या आधारावरून न्यायनिवाडा होत नव्हता. किल्ल्यांची रचना, पाण्याचे व्यवस्थापन, बाजार व्यवस्था, अभेद्य संरक्षण व्यवस्था असे देशामधील सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये पाहायला मिळते.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
    Mamata Banerjee: महाकुंभ बनला ‘मृत्युकुंभ’; सरकारने मृतांची संख्या लपवल्याचा ममता बॅनर्जी यांचा दावा
    ‘महापुरुषांवरील वादाला नसावी राजकीय किनार’
    पुणे :
    ‘महापुरुषांवरून होत असलेले वाद तेव्हाच मिटतील जेव्हा त्याला राजकीय किनार नसेल. महापुरुषांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना ना सरकार माफ करेल, ना जनता. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केली. फडणवीस यांनी ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. महापुरुषांच्या अनुषंगाने होणारे वाद थांबविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी इतिहास तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. यावर फडणवीस म्हणाले, ‘यापूर्वी जेव्हा-जेव्हा असे वाद झाले तेव्हा तेव्हा समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.’ छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराजांवर इतिहासाने अन्याय केला आहे. त्यांचे शौर्य ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. इतिहासाची प्रतारणा न करता हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सन २०१७मध्ये करमणूक कर रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता राज्यात करमणूक करच नसल्याने त्यात सूट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed