• Fri. Mar 6th, 2026

    गड होणार अतिक्रमणमुक्त! शिवनेरी किल्ल्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांची ‘टास्क फोर्स’ची घोषणा

    गड होणार अतिक्रमणमुक्त! शिवनेरी किल्ल्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांची ‘टास्क फोर्स’ची घोषणा

    Shiv Jayanti 2025: शिवजयंती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी किल्ल्यांवर आता कोणतीच अतिक्रमणे राहणार नाहीत, याचा पुनरुच्चार केला.

    महाराष्ट्र टाइम्स
    shivneri fadnavis

    म.टा.वृत्तसेवा, जुन्नर: ‘शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी ‘टास्क फोर्स’ स्थापन केला आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी किल्ले शिवनेरीवर केली.

    शिवजयंती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी किल्ल्यांवर आता कोणतीच अतिक्रमणे राहणार नाहीत, याचा पुनरुच्चार केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, आमदार शरद सोनवणे, बापू पठारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. अमोल डुंबरे, जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

    ‘शिवाजी महाराजांचा सर्वसमावेशक कारभार डोळ्यांसमोर ठेवून काम करण्यात येत असून, त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. शिवाजी महाराजांचे गड-किल्ले अभियांत्रिकी, स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. गड-किल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून, एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे शिंदे यांनी नमूद केले.
    एका व्यक्तीमुळे ठाण्यात पक्ष कमकुवत, अनेकजण पक्ष सोडून गेले; अजित पवार यांची नाव न घेता आव्हाडांवर टीका
    ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, किल्ले खऱ्या अर्थाने त्यांची दौलत आहेत. ते आपले शक्तिस्थान, स्फूर्तिस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने किल्ले शिवनेरी, रायगड प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ल्यांच्या परिसरात विविध विकासकामे केली जात आहेत. गड संवर्धनासाठी सरकार निधी कमी पडून देणार नाही,’ अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

    शिवजन्मस्थळी पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. राष्ट्रगीत, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलिस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलिस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, ‘शिवजन्मोत्सव सोहळा संपल्यानंतर तासाभरात कडेलोटाजवळ मधमाश्यांनी अचानक शिवभक्तांवर हल्ला केल्याने अनेक जण शिवजन्मस्थळाच्या दिशेने धावत सुटले. १५ ते २० जणांना मधमाश्यांनी लक्ष्य केले. आरोग्य पथकाकडील लस आणि इंजेक्शन बाधितांना देण्यात आले, असे वैद्यकीय पथकाचे आरोग्य अधिकारी श्रावण राऊत यांनी सांगितले.
    GBS Cases In Pune: जिल्ह्यात ३५ दिवसांत २०० रुग्ण; GBSमुळे विविध समस्या समोर, १३६ रुग्ण पालिका क्षेत्रातील
    आग्र्याच्या मीनाबाजार येथे शिवस्मारक
    नवी दिल्ली:
    छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांना कैदेत ठेवले होते, त्या आग्रा येथील मीनाबाजार भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक होणार आहे. शिवरायांच्या जयंतीनिमित्त आग्रा येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात सदर स्मारक बनविण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारला द्यावी. आम्ही असे भव्यदिव्य स्मारक आग्यात उभे करू की लोक ताजमहालाला नव्हे, तर छत्रपतींचे स्मारक पाहण्यासाठी जगभरातून येतील, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे नामकरण शिवाजी महाराज संग्रहालय असे करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारने ही जागा द्यावी, अशी मागणी केली. त्यावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित केंद्रीय मंत्री ए. पी. सिंह बघेल यांनी मीनाबाजार येथे सदर स्मारक निश्चित होईल, असे आश्वासन दिले. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed