मंत्रालयात फेस रेकग्निशन सिस्टिमची अंमलबजावणी सोमवारपासून गोंधळात झाली. डेटा पूर्ण अपलोड न झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना पास काढून मंत्रालयात प्रवेश करावा लागला. अनेकांचे यामुळे ‘लेटमार्क’ देखील लागले.
एफएआरएस या नव्या प्रणालीला सुरूवात
महायुती सरकारतर्फे मंत्रालयाची सुरक्षा आणि सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मंत्रालयात एफएआरएस या नव्या प्रणालीची घोषणा केली आहे. यानुसार मंत्री, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, अधिकारी, इतर कर्मचारी यांचा चेहरा स्कॅन करून त्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी एफआरएस या नव्या प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली. मात्र अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याची तक्रार आहे.
डेटा पूर्ण अपलोड झाला नसल्याने मोठा गोंधळ
मंत्रालय सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीचा डेटा पूर्ण अपलोड झालेला नाही. त्यामुळे सोमवारी मंत्रालय प्रवेशद्वारावर गोंधळ उडाला. अनेकांचा डेटा अपलोड न झाल्याने ओळखपत्र असूनही प्रवेश मिळाला नाही. नियमित पास काढून आत यावे लागले. यामुळे कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आपल्या दालनात जाण्यास उशीरा झाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना पाससाठी मोठ्या रांगा लावाव्या लागल्या.
पहिल्याच दिवशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लेटमार्क
हेच नाहीतर सकाळीची वेळ असतानाही मोठी गर्दी पास काढण्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर दिसली. गर्दी जास्त असल्याने पास काढण्यास आणि नंबर येण्यास कर्मचाऱ्यांना बराच उशीरा झाला आणि अनेकांचा यामुळे लेटमार्क लागला. एफआरएस या प्रणालीला सुरूवात झाली. मात्र, अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा डेटा नसल्याचे गोंधळ उडाला. अनेकांचा चेहरा स्कॅन होत नसल्याने त्यांना परत जाऊन पास काढून मंत्रालयात प्रवेश करावा लागला. डेटा पूर्ण अपलोड करण्याचे काम अजूनही सुरू असल्याची माहिती मिळतंय.

