Manoj Jarange Patil Attack on Dhananjay Munde : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे, तर राजकीय वातावरण देखील तापले आहे. आल्या दिवशी राजकीय नेत्यांकडून मोठे दावे केले जात आहेत. यातच जरांगे पाटलांनी पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा साधत मोठा खुलासा केला आहे.
निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडे भेटायला आले होते, यावेळी त्यांनी माझी वाल्मिक कराडची माझ्याशी ओळख करून दिली होती, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. पुढे धनंजय मुंडेंवर निशाणा साधत जरांगे म्हणाले, धनंजय मुंडे हे मला मराठ्यांनी सांभाळलं असं सांगतात, मग मराठ्यांनी सांभाळलं तर आता मराठ्यांचेच मुडदे पाडायला लागले का? असा खडा सवाल त्यांनी केला आहे. तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
तर पुढे मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीबाबत खुलासा केला आहे. धनंजय मुंडेंनी मला दोन ते तीन वेळा भेटायचा प्रयत्न केला, ते गेवराईपर्यंत आले होते, पण तिथून माघारी गेले नंतर आठ दिवसांनी परत भेटायला आले.’ त्यावेळी वाल्मिक कराडही तेथे आला होता हे माहित नव्हते. धनंजय मुंडेंनी ओळख करून दिली होती, तेव्हा मी म्हणालो हा तोच आहे का हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा.’
मनोज जरांगेंनी पुढे असेही नमूद केले की, अनेक राजकीय नेते मला भेटायला आले पण आम्ही कुणाला शब्द दिला नाही, देणारही नव्हतो कारण आमचं गणित जुळवणं सुरू होतं. हार्वेस्टर खरेदी करणाऱ्या लोकांना वाल्मिक कराडने मारलं होतं ते लोक माझ्याकडे आले होते, माझ्याकडे लोक आल्यानंतर त्यांच्या एका मध्यस्थीने हा विषय मिटवला आणि तो विषय तिथे थांबला होता.’
दरम्यान धनंजय मुंडे हे तुमच्या पाया पडले का? असा प्रश्नही त्यांना विचारला असता ते म्हणाले, काही राजकीय सामाजिक संकेत असतात ते पाळावे लागतात, मी पाळत असतो. येणारा प्रत्येक जण मदत करा म्हणत होता, पाया पडणे हा लय मोठा विषय आहे, असं मला वाटत नाही.

