Chandrapur News: आज आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन. २०२६ मध्ये रेषा विभाजन पद्धतीने प्रथमच व्याघ्रगणना करण्यात आली होती त्यानुसार देशभरातील आकडा चार हजारांहून अधिक राहण्याचा अंदाज आहे तर वाघांच्या क्रमांकासह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी विराजमान
३ हजार ६८२ वाघ भारतात
अखिल भारतीय व्याघ्रगणना मोहिमेअंतर्गत २०२६साठीच्या माहितीचे विश्लेषण केले जात आहे. यात देशभरात वाघांची संख्या साडेतीन ते चार हजारांहून अधिक तर महाराष्ट्राचा विचार करता हा आकडा ५३० ते ५५०दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार जगातील एकूण ७५ टक्के; ३ हजार ६८२ वाघ भारतात असल्याचे दिसून आले होते.
रेषा विभाजन पद्धतीने २००६मध्ये प्रथमच व्याघ्रगणना
डेहराडूनच्या भारतीय वन्यजीवसंस्थेने विकसित केलेल्या रेषा विभाजन पद्धतीने २००६मध्ये प्रथमच व्याघ्रगणना करण्यात आली होती. यंदादेखील सहाव्यांदा त्याच पद्धतीने व्याघ्रगणनेची मोहीम राबविली जात आहे. ‘ट्रान्झॅक्ट लाइन’, ‘कॅमेरा ट्रॅपिंग’सह माहिती संकलनाचे टप्पे विविध राज्यांतील वनविभाग, राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनात आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या मदतीने जवळपास पूर्ण करण्यात आले आहेत. लवकरच त्याची माहिती संकलन करून वाघांची आकडेवारी २०२७च्या जुलैपर्यंत हाती येण्याची दाट शक्यता आहे.
राज्यातही व्याघ्रसंवर्धनाचे चांगले कार्य
भारतात वाघांची संख्या २०२२च्या प्रगणनेनुसार ३ हजार ६८२ आहे. प्राथमिक अंदाजानुसार यंदा तो आकडा देशात चार हजारांहून अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. राज्यातही व्याघ्रसंवर्धनाचे चांगले कार्य झाल्याने व्याघ्रवाढीचा अंदाज आहे. यंदा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह चंद्रपूर प्रादेशिक लँडस्केपमध्ये फारशी वाढ दिसणार नाही. या भागात वाघांची संख्या जवळपास स्थिर राहील.
ST Bus: एसटी प्रवासात सवलतीसाठी NCMC सक्तीचे; आधी टोकन, मग कार्डसाठी रांगा, महिला-ज्येष्ठ नागरिकांची पिळवणूक
येथेही व्याघ्रवाढ दिसून येणार
मागील वेळेस नागपूर प्रादेशिक व गडचिरोलीचा काही भाग व्याघ्रगणनेत न आल्याने यंदा या भागात ती वाढ दिसू शकते. सोबतच मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर, पेंच तसेच सह्याद्री व्याघ्रप्रकल्प, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी येथेही व्याघ्रवाढ दिसून येणार आहे. वाघांचे व चितळांचे स्थानांतरण व तत्सम प्रयोग याचा पुढील काळात चांगला परिणाम दिसून येईल. तूर्त माहितीचे विश्लेषण केले जात आहे. या विश्लेषणानंतरच नेमका आकडा समोर येणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
संख्यावाढीमागची कारणे…
पूर्वी वाघीण आयुष्यात एक ते दोन वेळा पिल्लांना जन्म देत असे. मात्र मागील काही वर्षांत काही वाघिणींनी चार ते पाच, तर काही वेळा सहा वेळाही बछड्यांना जन्म दिल्याची नोंद झाली आहे. पूर्वी वाघीण आपल्या बछड्यांना दोन ते अडीच वर्षे, कधी कधी तीन वर्षांपर्यंत सोबत ठेवत असे. आता मात्र अनेकदा पंधरा ते अठरा महिन्यांतच ती त्यांना स्वतःपासून दूर करते. मोठ्या वाघांकडून बछड्यांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही नैसर्गिक कृती असावी, असे जाणकार मानतात.
ताडोब्यातील व्याघ्रसंख्येत सातत्य आणि वाढ
दुसरीकडे व्याघ्रसंवर्धनात स्थानिक ग्रामस्थांचा सहभागही महत्त्वाचा ठरतो. जंगल वाचले तर रोजगार टिकतो आणि पर्यायाने आपले जीवनही सुरक्षित राहते, अशी भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली तर संवर्धनाला बळ मिळते. ताडोबा परिसर हे त्याचे ठळक उदाहरण मानले जाते. त्यामुळे ताडोब्यातील व्याघ्रसंख्येतील सातत्य आणि वाढ महत्त्वपूर्ण ठरली आहे.
Vidarbha Rain Update : विदर्भातील 3 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, नागपूरमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
देशाने ५८६ वाघ गमावले
व्याघ्रवाढीची सुखद बाब मानली जात असतानाच देशाने मागील तीन वर्षे सात महिन्यांत देशाने ५८६ वाघ गमावले आहेत. त्यात १२८ वाघ गमावून देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर १८३ वाघांसह मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. त्यातील मृत्यू हे वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकारीत वा नैसर्गिकरित्या अशा विविध कारणांनी झाले आहेत. अपघात व शिकारीच्या घटना जारीच असल्याने तो चिंतेचा विषय मानला जात आहे.
