Kite Nylon Manja Banned : नायलॉन मांजावर बंदी असूनही अहिल्यानगर जिल्ह्यासह या मांजाची संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा मांजा येतो कुठून असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना तसंच अनेकांना पडला असून याला कधी चाप बसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आनंदाचे प्रतीक असलेल्या मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा खेळ खेळला जातो. यासाठी पारंपारिक मांजाचा उपयोग केला पाहिजे, मात्र नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने पतंग उडवण्याची भारी हौस मात्र अनेकांसाठी जीवघेणी ठरत असल्याचं वास्तव सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. इतरांपेक्षा आपलाच पतंग उंच उडावा आणि आपणच पतंगाचे किंग ठरावे या इर्शेतून चक्क प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरून सर्रास पतंग उडवले जात आहेत. मात्र घातक मांजामुळे निष्पाप जीवांचा नाहक बळी जात असून अनेक दुचाकीस्वारांच्या गळ्याला इजा झाली, तर अनेक बालकांचे हात चिरले आहे. तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना देखील इजा झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बंदी असलेला नायलॉन मांजा दरवर्षी राज्यभरासह अहिल्यानगर जिल्ह्यात कसा पोहोचतो? तो बेसुमार कसा विकला जातो? हे प्रश्न अनुत्तरीत राहत आहे.
नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून जुजबी कारवाया केल्या जात असून प्रशासन ठोस भूमिका घेऊन कारवाई का करत नाही? प्रशासनाकडून चिरीमिरी घेऊन नायलॉन मांजा विक्रीला छुपा पाठिंबा आहे का? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहे. सध्या गल्लोगल्ली अनेक मुलांच्या हातात नायलॉन मांजा आणि गुंता झालेल्या नायलॉन मांजा रस्त्यावर पडलेला आढळून येत आहे.
नायलॉन मांजाला ढील कुणाची? जीवाला घातक, कायद्याने बंदी तरी…. बेसुमार विक्रीला बसणार का चाप?
मुख्यमंत्री दखल घेणार का?
जीवघेण्या नायलॉन मांजावरील बंदी फक्त कागदोपत्रीच मर्यादित असल्याचं चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. राज्यात मागील महिन्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताच देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांजा राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना मुख्यमंत्री याची दखल का घेत नाही? असा प्रश्न उपस्थित होत असून आता ही संपूर्ण परिस्थिती समोर मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची दखल घेणार का? आणि फडणवीस यांचं प्रशासन आता कामाला लागून कारवाई करणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

