रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे दाखले देऊन भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या अनेक नेत्यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून कुणाला उमेदवारी द्यावी, याच्या सूचना भाजप नेतृत्वाने केल्या. जिंकून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी असाच निकष ठेवण्यात आला. हेच लक्षात घेऊन रामदास आठवले प्रबळ उमेदवार नसल्याचे कारण पुढे करून शिर्डीतील विखे पाटील यांनी आठवले यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करून त्यांना जागा देऊ नये, अशी भूमिका फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मांडली असल्याचे आठवले यांनी सांगितलं आहे. चर्चेदरम्यान तुम्हाला जागा का मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटलांवर आरोप केला. विखे पाटलांनी लिहिलेल्या पत्रात आरपीआय पक्षाला जागा देऊ नका असं त्यांनी म्हंटलं होतं, असं वक्तव्य करत आठवलेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
या चर्चेत जागावाटपावर बोलताना आठवले म्हणाले की, मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं, आपल्याला जागा मिळत नाही, काय करायचं? युती तोडायची का? मात्र सगळ्यांनीच सांगितलं, तुम्ही सत्तेत असणं महत्त्वाचं आहे. जरी जागा मिळाली नाही तरी आपली राज्यसभा २०२६ पर्यत आहे. आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलून कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करावी. आपण मोदींच्या सोबत राहायला पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.
स्वबळावर लढण्याचा आंबेडकरांचा निर्णय चांगला – आठवले
नुकतीच वंचितने मविआसोबतची युती तोडली. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांचा मला आदर आहे. ते अत्यंत चांगले राजकारणी आहेत. निवडणुकीच्या काळात चांगला लीड घेण्यात प्रकाश आंबेडकर हुशार आहेत. मात्र मविआत त्यांना घेतलं गेलं नाही. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा त्यांचा निर्णय चांगला आहे. त्यांचा उमेदवार निवडून नाही आला तरी ते निवडणुकीच्या काळात चर्चेत असतात. कुणाला पाठिंबा द्यायचा कुणाला नाही. तसेच कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही, हे त्यांचे डावपेच आहेत. यात ते हुशार आहेत. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने नाईलाजाने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. तो योग्य असल्याचे आठवले म्हणाले आहेत.
अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना विरोध करणार नाही – आठवले
प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्यावर रामदास आठवलेंना सांगितलं की, भविष्यात आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर दलितांसाठी एकत्र काम करु. त्यांची भूमिका मांडू. त्यांच्यासोबत युती करण्यावर माझी हरकत नाही मात्र त्यांची तशी इच्छा दिसत नाही. मी अनेकवेळा त्यांच्यासमोर माझी भूमिका मांडली. मात्र काही अडचणींमुळे ते होत नाही. समाजाने मनावर घेतलं तर हे होऊ शकतं. याला माझी हरकत नाही, असं त्यांनी सांगितलं. तसेच अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना विरोध करणार नसल्याचं रामदास आठवले म्हणाले आहेत.