• Thu. Mar 12th, 2026
    तिकीट न दिल्यानं दुपारी पदाचा राजीनामा, आता भाजपचा झेंडा हाती, नामदेव उसेंडी यांचा BJPत प्रवेश

    गडचिरोली : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे गडचिरोतील कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव तथा आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आज दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी नुकताच सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.कॉंग्रेसला गेल्या काही दिवसांपासून एका मागे एक धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी क्रॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
    लोकसभेचं तिकीट नाकारलं, काँग्रेसवर गंभीर आरोप, डॉ. उसेंडी यांचा तडकाफडकी राजीनामा

    दरम्यान, आज दुपारी डॉ. नामदेव उसेंडी यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यात ते म्हणाले होते की, ”मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या पदावर कार्यरत होतो. नेमणूकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी कॉंग्रेस पक्षाचा संघटन करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मी गडचिरोली जिल्ह्याचा स्थानिक उमेदवार म्हणून पक्षाकडे गडचिरोली – चिमुर या लोकसभा क्षेत्राची उमेदवारी मागितली होती. स्थानिक व राज्य पातळीवरचं माझं काम पाहून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू स्थानिक व राज्य पातळीच्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाने षडयंत्र करुन या लोकसभा क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीला गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी दिली”.

    ”घटनेच्या तरतुदीनुसार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे स्थानिक आदिवासींची लोकसंख्या गृहीत धरुन या भागातील प्रश्न व समस्या लोकसभेत मांडून सोडविले जातील, हा उद्देश होता. अशी संकल्पना दृष्टीस ठेऊन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र आदिवासीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेला होता. या संकल्पनेला छेद देवून प्रदेश पातळीवरील नेत्यांनी आपसी गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा बळी घेऊन गडचिरोली जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने स्थानिक नेतृत्वावर अन्याय झालेला आहे. माझ्या सारख्या पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत करण्याऱ्या कार्यकर्त्याला कॉंग्रेसचे स्थानिक व राज्यपातळीवरील नेतृत्व गटबाजीने ग्रस्त असल्यामुळे न्याय देवू शकत नसेल, तर या क्षेत्रातील लोकांना न्याय कसा मिळेल? या बाबीचा विचार करुन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे”, असं ते दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed