• Sun. Aug 2nd, 2026

    Weather Forecast: पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पाण्याची चिंता मिटली; पुढील दोन दिवस कसे असणार हवामान? IMD चा ताजा अंदाज

    Weather Forecast: पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पाण्याची चिंता मिटली; पुढील दोन दिवस कसे असणार हवामान? IMD चा ताजा अंदाज

    IMD Rain Alert: पोषक वातावरण नसल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.

    हवामान अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार बरसलेल्या पावसाने शनिवारी विश्रांती घेतली. दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. पुढील दोन दिवस शहरात हलक्या सरी, तर रविवारी घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

    बंगालच्या उपसागराकडून छत्तीसगड, विदर्भावरील कमी दाबाचे क्षेत्र आता विरळ झाल्याने शनिवारी सर्वच ठिकाणी पावसाचा जोर ओसरला. पुण्यामध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत कोवळे ऊन पडले होते; पण दहानंतर पुन्हा ढग दाटून आले आणि अकराच्या सुमारास काही वेळ सर्वदूर हलक्या सरी पडल्या. दुपारी वारेही सुटले होते. त्यामुळे हवेत गारवा जाणवला. पाऊस थांबल्यामुळे पुणेकर संध्याकाळी कामासाठी बाहेर पडले होते. अनेकांना शनिवारी सुट्टी असल्याने मध्यवर्ती पुण्यात आणि बाजारपेठांमध्ये चारनंतर गर्दीही झाली. रात्री आठनंतर काही भागांत पुन्हा पाऊस सुरू झाला.

    दोन दिवसांच्या तुलनेत कमाल तापमानात थोडी वाढ होऊन दिवसभरात कमाल २८.६ आणि किमान २३.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदांज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. पुण्याबरोबरच राज्यातील बहुतांश भागात पुढील आठवड्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

    पाण्याची चिंता मिटली

    ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदाचा कमी पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर ‘पुढे काय होणार’ अशा चिंतेत असलेल्या पुणेकरांना जुलै महिन्यातील पावसाने दिलासा दिला आहे. पुणे शहाला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात महिनाभरापूर्वी अवघा ३.६६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी असताना जुलैतील जोरदार पावसामुळे पाणीसाठा २५ टीएमसीने वाढला आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातील धरणे जवळपास भरली असून, धरणांत एकूण २८.६१ टीएमसी म्हणजेच ९८ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.

    खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांपैकी एक जुलैला टेमघर धरण रिकामे होते, तर खडकवासल्यात अर्धा टीएमसीपेक्षा कमी पाणी होते. मात्र, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातील पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खडकवासला धरण पहिल्यांदा शंभर टक्के भरले, तर आता दुसऱ्यांदा हे धरण भरले आहे. खडकवासला आणि वरसगाव ही दोन्ही धरणे शनिवारी १०० टक्के भरली आहेत. पाण्याची पातळी आणि सुरक्षितता राखण्यासाठी सहा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणात २८ टीएमसीपेक्षा अधिक पाणी जमा झाल्याने वर्षभराची पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटल्याचे मानले जात आहे.