रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज जात प्रमाणपत्रामुळे रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं गजभिये यांनी सांगितलं.
‘प्रत्येक पक्षाला पहिल्या नंबरच्या उमेदवारासोबत आणखी एक उमेदवार देण्याचा अधिकार असतो. ज्याला आपण डमी उमेदवार म्हणतो. असा उमेदवार देण्याची पद्धत आहे. तांत्रिक कारणामुळे एखाद्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास, पडताळणीमध्ये उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्यास त्या पक्षाला दुसऱ्या उमेदवाराच्या माध्यमातून निवडणूक लढवता येते’, असं गजभिये म्हणाले.
रश्मी बर्वेंच्या जात प्रमाणपत्राची चौकशी सुरू आहे. तशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये आहेत. काही नोंदी समोर आल्या आहेत. या सगळ्याची पडताळणी आणि पाहणी केल्यानंतर माझ्या लक्षात येतंय की त्यांचा अर्ज बाद होऊ शकतो. मी जिल्हाधिकारी म्हणून काम केलंय. लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची पडताळणी आम्ही केलेली आहे. निर्वाचन अधिकाऱ्यासमोर जेव्हा अर्जाची पडताळणी होईल तेव्हा बर्वेंचा अर्ज टिकणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. मी स्वत: वकील आहे. कायद्याचा अभ्यास केलाय. त्याच्या आधारे मी सांगतोय बर्वेंचा अर्ज टिकणार नाही, असं गजभिये ठामपणे म्हणाले.
‘काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्या घरी जाऊन मी चर्चा केली. त्यांच्याकडून परवानगी घेतली. जर बर्वेंचा अर्ज फेटाळला गेला आणि काँग्रेस पक्षाचा दुसरा अर्ज नसेल तर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकतो. अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. काँग्रेस पक्षाचा दुसरा उमेदवार तयार असायला हवा म्हणून मी त्यांची परवानगी घेतलेली आहे,’ असं गजभिये यांनी सांगितलं.
तुम्हाला पक्षानं अर्ज दिला आहे का, असा प्रश्न गजभियेंना विचारण्यात आला. त्यावर पहिल्या उमेदवाराला त्याचा एबी फॉर्म त्याच्या हातात दिला जातो. दुसऱ्या उमेदवाराचा फॉर्म पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याकडे असतो. पहिला फॉर्म रद्द झाला तर दुसरा फॉर्म लगेच दिला जातो. ते कोरे फॉर्म असतात. त्यावर स्वाक्षरी असते. प्रदेशाध्यक्षांच्या सहीनं तो फॉर्म दिला जातो. त्यातील रिकामी जागी भरायची असते. तो फॉर्म मला द्यावा अशी विनंती प्रदेशाध्यक्ष पटोलेंकडे केली आहे. अद्याप मला वरुन आदेश आलेले नाहीत. जसे आदेश येतील तसा मी तो फॉर्म देईन, असं पटोलेंनी मला सांगितलं, अशी माहिती गजभियेंनी दिली.