नांदेड : मराठवाडा दौऱ्यावर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडच्या सभेत भाजपावर सडकून टिका केली. “भाजपचं बियाणं बोगस आहे, म्हणून त्यांच्यावर बाहेरून माणसं घेण्याची वेळ आली आहे. पण महाराष्ट्रात मोदींच्या नावाने नाही तर ठाकरे नावाने मतं भेटतात. तेव्हा आणखी एक ठाकरे चोरण्याचं प्रयत्न भाजप करत” असल्याची टिका उद्धव ठाकरे यांनी केली. नांदेडमधील अनूसया गार्डन येथे पार पडलेल्या कुटुंब संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राज्य संघटक एकनाथ पवार आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात ठाकरे यांच्या नावाने मतं भेटत असल्याने भाजपने सुरुवातीला बाळासाहेबांचा फोटो चोरला, काही फरक पडत नाही. आज आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत आहेत, घेऊन जा” अशी टीका करत “मी आणि माझी जनता समोरासमोर आहोत, तेवढे मला पुरे” असं पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले. ”२००९ आणि २०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याची पडताळणी करा. योजनांचा किती जणांना लाभ मिळाला ते विचारा. प्रधानमंत्री आवास नाही आभास योजना आहे. पिक विमा योजना, आपत्ती काळातील मदत मिळाली का? शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली का? लागवडीचा खर्च वाढला आहे. यांच्याकडेच अस्सल बियाणे नाही ते शेतकऱ्यांना काय देणार”, असा प्रश्न उपस्थित करून ”आमचे हिंन्दुत्व राष्ट्रीयत्व आहे. घरातील चुली पेटविणारे आमचे हिंन्दुत्व आहे. तर, भाजपचे घर पेटवणारे हिंन्दुत्व आहे. भाजपला सत्तेचा हव्यास आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ, मिळून तिथे खाऊ, अशी भाजपची निती आहे” अशी टीका केली. ”विचारांची पेरणी करा, मोदींच्या थापा जनतेपर्यंत पोहोचवा”, असं आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले.
दोन दिवसात उमेदवारांची नावे जाहीर
”लोकसभा निवडणूकीचे महाविकास आघाडीतील जागा वाटप झाले आहेत. यात चुका करून चालणार नाही. पक्ष न पाहता हुकूमशाहीला गाडावं लागेल. येत्या दोन दिवसात उमेदवारांची नावे जाहीर होतील”, असेही शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले. ”नांदेडमध्ये महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार असेल. आपला उमेदवार समजून कार्यकर्त्यांनी विजयासाठी कामाला लागावे”, असं आवाहन देखील ठाकरे यांनी केले.