गेल्या दीड वर्षांत परिस्थिती बरीच बदलली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं बंड, त्यांना मिळालेलं पक्ष आणि चिन्ह, दोघांनी भाजपसोबत केलेला घरोबा पाहता विधानसभेतील पक्षीय बलाबलाचं चित्र पालटलं आहे. सध्याच्या घडीला भाजपकडे ३ उमेदवार विजयी होतील इतकं संख्याबळ आहे. भाजपसोबत असलेले लहान पक्ष आणि अपक्ष आमदार यांच्या साथीनं ३ उमेदवार विजयी होऊ शकतात. तर शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळू शकते.
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. भाजपनं त्याआधी अतिशय घाईत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना पक्षात सामील करुन घेतलं. चव्हाणांच्या रुपात भाजप राज्यसभा निवडणुकीत चौथा उमेदवार देईल अशी चर्चा आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी ४० चा कोटा आहे. विधानसभेत काँग्रेसचे ४३ आमदार आहेत. काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी दिली आहे. चव्हाणांनी काँग्रेसच्या काही आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास, निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यास हंडोरेंची वाट बिकट होऊ शकते.
काँग्रेसचे १५ आमदार राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात क्रॉस व्होटिंग करू शकतात. तसं झाल्यास हंडोरेंचा पराभव होऊ शकतो. जून २०२२ मध्ये भाजपनं अशीच खेळी केली होती. महाविकास आघाडीची मतं फुटली होती आणि भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले होते. त्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता. आता भाजपची खेळी यशस्वी झाल्यास भाजपचा चौथा उमेदवार विजयी होईल. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक-एक उमेदवार विजयी झाल्यास महाविकास आघाडीच्या पदरात भोपळा पडू शकतो.
परिस्थिती सेम, काँग्रेसचा गेम? चव्हाण डाव टाकण्याच्या तयारीत; राज्यसभेचं गणित बिघडणार?

मुंबई: जून २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. पुरेसं संख्याबळ नसूनही भाजपनं राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार दिला. महाविकास आघाडीची किती मतं फुटतात याची चाचपणी या निमित्तानं भाजपनं करुन पाहिली. भाजपनं तिसरा उमेदवार देत निवडणूक चुरशीची केली. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेगवार संजय पवारांचा पराभव झाला होता.