Manoj Jarange Patil On Tukaram Mundhe: भेसळखोरांविरोधातील तुकाराम मुंढेंच्या कारवायांची राज्यभर चर्चा सुरु आहे. त्याचबरोबरीने त्यांच्या बदलीच्या चर्चाही सुरु आहेत, त्यावरुन आता मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला नेमका काय इशारा दिला?
आपल्या कडक आणि पारदर्शक प्रशासनशैलीसाठी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची शासकीय सेवेत आतापर्यंत २५ वेळा बदली झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर छापे टाकत कोट्यवधी रुपयांचा संशयित भेसळीचा साठा जप्त केला. त्यांच्या कारवाईमुळे अनेक अवैध रॅकेट उघडकीस आली असून सर्वसामान्यांकडून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.
दरम्यान, मुंढे यांच्या कामकाजाची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या बदलीबाबतही राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. तुकाराम मुंढे हे जनहिताचे काम करत असून त्यांच्या कारवाईमुळे नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी उलथापालथ, एकाच जिल्ह्यातल्या 33 हजार महिला कायमच्या अपात्र; राज्यभरातील लाभार्थ्यांची धाकधूक वाढली
सरकारने बदलीचा विचार करू नये; अन्यथा…
मनोज जरांगे पाटील यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत सरकारने त्यांच्या बदलीचा विचार करू नये, असे स्पष्टपणे सांगितले. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखल्यास सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल, तर दुधातील भेसळीवर नियंत्रण आल्यास शेतकऱ्यांच्या शुद्ध दुधाला योग्य दर मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सरकारने त्यांच्या कामात अडथळे आणू नयेत, त्या भानगडीत सरकारने पडूच नये, अन्यथा आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेऊ, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
शेतकरी प्रश्नांवरही भाष्य
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचाही उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ते आंदोलन करत असल्याने त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ कर्जमाफी नव्हे, तर संपूर्ण कर्जमुक्तीचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
