• Wed. Jun 17th, 2026
    Jalna News : तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती, ज्यूस, आईस्क्रीमच्या दुकानांचं शटर डाऊन; भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाईची मोहीम

    Jalna Tukaram Mundhe : आगामी काळात प्रशासनाची मोहीम आणखी वेगाने राबवली जाण्याची शक्यता असून अन्न व्यवसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे ठरणार आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि व्यापारी यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

    अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : राज्यातील प्रशासनात सध्या चर्चेचा मुद्दा असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानं राज्यात अन्नातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) सुरू करण्यात आलेल्या कठोर कारवाईचा परिणाम आता जालना शहरासह ग्रामीण भागातही दिसून येऊ लागला आहे. परिसरातील अनेक ज्यूस सेंटर, आईस्क्रीम पार्लर, शीतपेय विक्री केंद्रे तसेच काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून आपली दुकाने तात्पुरती बंद ठेवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून बाजारपेठेत विविध चर्चांना उधाण आलं आहे.

    व्यापाऱ्यांमध्येही धास्तीचे वातावरण

    अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविणे, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राजूर परिसरातील व्यापाऱ्यांमध्येही धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
    Maharashtra TimesRohit Pawar : रोहित पवारांच्या आई, पत्नी, मुलं भावूक; संपूर्ण कुटुंबिय पंढरपुरात आंदोलनस्थळी दाखल
    उन्हाळ्याच्या हंगामात ज्यूस, आईस्क्रीम आणि थंड पेयांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. या काळात ग्राहकांची संख्या वाढलेली असते. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून अनेक दुकाने बंद असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही व्यापाऱ्यांनी संभाव्य तपासणीच्या भीतीने आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तात्पुरती दुकाने बंद ठेवल्याची चर्चा बाजारपेठेत सुरू आहे.

    कच्च्या मालाचा वापर

    स्थानिक नागरिकांच्या मते, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अन्नातील भेसळ रोखणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा कमी दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर, अस्वच्छ वातावरणात तयार होणारे खाद्यपदार्थ, कालबाह्य वस्तूंची विक्री किंवा निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा वापर यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे.

    दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून सर्व खाद्य व्यवसायिकांना आवश्यक परवाने घेणे, स्वच्छतेचे नियम पाळणे, दर्जेदार कच्चा माल वापरणे आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नसल्याचेही प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
    Maharashtra TimesMatheranchi Rani Mini Train : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘माथेरानची राणी’ मिनी ट्रेन चार महिन्यांसाठी सुट्टीवर, कारण काय?

    नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे

    काही व्यापाऱ्यांनी मात्र प्रशासनाच्या वाढत्या कारवाईमुळे व्यवसायिकांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे सांगितलं. तपासणीदरम्यान कोणतीही त्रुटी आढळू नये यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि परवान्यांची पूर्तता केली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. जिल्ह्यात ज्यूस, आईस्क्रीम आणि शीतपेय विक्री केंद्रे तात्पुरती बंद राहण्यामागे तुकाराम मुंढेंच्या संभाव्य तपासणीची भीती हे प्रमुख कारण असल्याची चर्चा रंगत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा