मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली (ता. अंबड) येथे मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक होणार आहे. राज्य सरकारने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक आहे. मात्र, त्यापूर्वीच सरकारने सावध पवित्रा घेतला. पालकमंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. कुणबी नोंदी शोधण्याचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडणार नाही त्यांनाही मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर आरक्षणात समाविष्ट केले जाईल, असे महाजन म्हणाले.
राज्य सरकार गांभीर्याने काम करीत आहे. त्यामुळे समाजहितासाठी २४ डिसेंबरच्या मुदतीवर अडून राहू नये. मागासवर्ग आयोगाच्या कामासाठी वेळ लागणार असल्याने वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती महाजन यांनी केली. उपोषण सोडताना विचारपूर्वक चर्चा झाली होती. त्यानुसार राज्यभरातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाही. अंतरवालीत १३२ पोलिसांनी लाठीमार केला. त्यांची चौकशी करण्यासाठी आमच्या तक्रारी नोंदवून घ्या. घराची जाळपोळ करणारे मराठा आंदोलक नव्हते असे आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात सांगितले आहे. त्यानंतरही निर्दोष आंदोलकांना अटक करीत आहेत. या प्रकारामुळे आंदोलनाला डाग लागला आहे, असे जरांगे म्हणाले. याप्रकरणी आपण माहिती घेऊ असे आश्वासन महाजन यांनी दिले.
राज्य सरकार कुणबी नोंदीबाबत काम करीत आहे. त्यामुळे आंदोलन भरकटेल असा निर्णय घेऊ नका, असे महाजन म्हणाले. अंतरवाली येथील बैठकीत सरकारने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करू असे जरांगे म्हणाले. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजना, तरुणांना केलेले कर्जवाटप, विविध योजनांची माहिती असलेला प्रस्ताव शिष्टमंडळाने जरांगे यांना सोपविला.
मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात बोलणार आहेत. सरकार टिकणारे आरक्षण देणार असल्यामुळे २४ डिसेंबरच्या मुदतीवर अडून न राहता मागासवर्ग आयोगाच्या अहवालासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत. तर अंतरवाली येथील उपोषण सोडताना मंत्र्यांच्या शिष्टमंडळासमोर झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारने काम करावे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार होते, पण इथे दररोज नोटीसा पाठवत आहेत. कुणबी नोंदींचे काम चांगले झाले आहे. पण, इतर मागण्यांबाबत आजच्या बैठकीत चर्चा करु, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे म्हणाले आहेत.