पहिल्या दिवसापासून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. चार पथक नेमून आरोपीची शोध मोहीम सुरू होती. दरम्यान, सुरुवातीला ही हत्या जुन्या वादातून आणि पैशांच्या वादातून झाली असल्याचा सांगण्यात येत होतं. मात्र, आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून ते एकत्र कसे आले? ही हत्या सुपारी घेऊन तर झाली नाही ना? असा संशय पोलिसांना आला असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
गजानन तौर याच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण गोरे, रोहित ताटीमापुलवार हे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना न्यायालयाने १० दिवसांची २२ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर संशयित आरोपी भागवत डोंगरे याच्यावर चाकूने वार झाल्याने त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तर टायगर (नाव माहिती नाही) नावाचा आरोपी फरार आहे. दरम्यान, तौर खून प्रकरणातील पाचपैकी दोन आरोपींचा जालना – नांदेड असा प्रवास असल्याने या आरोपींनी एकत्रित येत सुपारी घेऊन तर ही हत्या केली नाही ना? या दृष्टीनेही जालना पोलीस खोलावर जाऊन तपास करत आहेत.
नव्या संशयाची सुई अद्याप पोलिसांच्या हाताला न लागलेल्या टायगर (नाव माहीत नाही) याच्यावर आहे. आरोपीने या पूर्वी सेवली भागात जमिनीच्या वादातून एकाची हत्या केल्याचा पोलीस रेकॉर्ड आहे. आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याचा या हत्या प्रकरणातील सहभाग पोलिसांना सुपारी दिली असल्याचा संशय येण्यासाठी कारण ठरतेय. त्यामुळे या हत्या प्रकरणाचे गुड या आरोपीच्या शोधानंतरच संपेल असं दिसतंय.