• Tue. Mar 10th, 2026
    ऊस दरासाठी राजू शेट्टी आक्रमक, स्वाभिमानीचा चक्काजाम, महामार्गावर वाहनांच्या रांगा

    कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाला दर मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी चार बैठका घेण्यात आल्या. मात्र अद्यापही ऊस दराबाबत कोणताच तोडगा निघाला नाही. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत स्वाभिमानीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीतही निर्णय न झाल्याने बुधवारी रात्रीपर्यंतची वेळ स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिली होती. मात्र शेट्टींचा अल्टीमेटम साखर कारखानदारांनी धुडकावली. त्यानंतर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग रोखून धरून साखर कारखानदारांना हिसका दाखवू असा इशारा शेट्टी यांनी दिला होता. त्यानुसार आज राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली पुलावर हे आंदोलन सुरू झालं आहे. गेल्या ५ तासांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू असून हजारो शेतकरी राजू शेट्टी यांच्या समवेत महामार्गावर बसले आहेत. तर या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तैनात करण्यात आला आहे.

    पोलिसांचा खडा पहारा; अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी

    राजू शेट्टी यांच्या गेल्या चार तासापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थळी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने सुमारे अडीचशे पोलीस कर्मचाऱ्यांसह २८ अधिकारी येथे तैनात करण्यात आले आहे. तर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही गोकुळ शिरगाव मार्गे वळवण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने आणि बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत असून अनेक नागरिक पाच ते सहा किलोमीटर चालत जात आहेत. तर वठार, शियेफाटा ,कसबा बावडा येथे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

    स्वाभिमानीच्या शिलेदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अल्टिमेटम दिल्यानंतरही कारखानदारांनी मागील हंगामातील पैसे न देण्यावर ठाम भूमिका घेतल्याने अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरून शिरोली येथे महामार्ग रोखण्यावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत आता तडजोड नाही, अशीच भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली असताना, पोलीस प्रशासनाने मध्यरात्री स्वाभिमानीच्या शिरोळ आणि जयसिंगपूर मधील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे यांना आज पहाटे शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे. आजचे चक्का जाम आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. तर सकाळपासून पालकमंत्री आणि राजू शेट्टी यांच्या फोन द्वारे चर्चा सुरू असून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed