ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये झालेल्या बंडामध्ये महाविकास आघाडीचे ताकद कमी झाली. विशेषतः कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात असलेले दोन्ही विद्यमान खासदार हे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटांसोबत महायुतीमध्ये सामील झाले. यामुळे आगामी लोकसभा आणि हातकणंगले मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न महाविकास आघाडीसमोर उपस्थित झाला आहे. कारण महाविकास आघाडी मधील तिन्ही प्रमुख पक्षानी या दोन्ही मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. मात्र विद्यमान आमदार हे शिवसेनेचे असल्याने दोन्ही जागांवर आमचाच उमेदवार असेल अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र जागा वाटपाच्या बैठकीत हातकणंगलेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर कोल्हापूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता असल्याने आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची मातोश्रीवर बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीला कोल्हापूर मतदारसंघातून इच्छुक असलेले जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके हे उपस्थित असणार आहेत. तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रत्येक उमेदवाराची मतदार संघात असलेली ताकद आणि इतर चर्चा होणार आहेत.
राजू शेट्टीची भूमिका गुलदस्त्यात
तर कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता असून येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा चिरंजीव प्रतीक पाटील याला उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेल्या बंडा नंतर हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीची ताकद पाहता येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत महाविकास आघाडी आहे. मात्र राजू शेट्टी यांनी यावर अद्याप याबाबत कोणतेही भूमिका जाहीर केली नसून याबाबत त्यांना विचारले असता अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे सध्या मला ऊस उत्पादकाचे प्रश्न आणि त्याला चारशे रुपये मिळवून द्यायचं हेच दिसत आहे. लोकसभा निवडणुकी संदर्भात या आंदोलनानंतर विचार करेन आणि विचार करताना सर्व विरोधक एकत्र येत निवडणूक लढवण्याचा योजना करत आहेत आणि हे सर्वजण मिळून शेतकऱ्यांच्या आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून कोणाबरोबर आणि का मैत्री करावी याचाही आम्हाला विचार करावा लागेल. कोण आम्हाला गृहीत धरतं हे पाहण्यापेक्षा आम्ही काय निर्णय घेतो हे महत्त्वाचा आहे. असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. यामुळे आगामी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून उमेदवार चाचपणी आत्तापासूनच सुरू झाली आहे.