गुजरात येथील एका कापड व्यापाऱ्याच्या मुलाचे आणि मुलीचे लग्न ठरले होते. डिसेंबर महिन्यात २१ आणि २२ तारखेला त्यांचे लग्न करण्याचे ठरले होते. या दोन्ही लग्नात दागिने बनविण्यासाठी व्यापाऱ्याला ५०० ग्रॅम सोन्याची गरज होती. बाजारात सुमारे ६३ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम असा सोन्याचा दर असल्याने व्यापाऱ्याने आपल्या परिचयातील व्यक्तींना स्वस्त सोन्याबाबत विचारणा केली. एका व्यक्तीने मुंबईतील एकाचे नाव सांगितले. व्यापाऱ्याने मुंबईतील तरुणाला संपर्क केल्यानंतर त्याने आणखी दोन चार जणांची नावे सांगितली.
४५ हजार रुपये प्रति दहाग्रॅम दराने सोने मिळेल असे या सर्वांनी सांगितले. मात्र ५०० ग्रॅम खरेदी करायचे असल्याने व्यापाऱ्याने दर कमी करण्यास सांगितले. तडजोडीअंती ४० हजार प्रति दहा ग्रॅम या दराने सोने देण्याचे ठरले. चार ते पाच जणांनी व्यापाऱ्याला १ नोव्हेंबर रोजी वीस लाख रुपये घेऊन मुंबईत बोलावले. व्यापारी आपल्या काही नातेवाईक आणि मित्रांसह गुजरातहून मुंबईत आला. आधी कुर्ला येथे आणि नंतर त्याला ऐरोली येथे बोलाविण्यात आले. रिक्षातून काहीजण सोन्याची बिस्किटे घेऊन आले.
जवळपास २० बिस्किटे पिशवीत होती. व्यापाऱ्याने केवळ पाच बिस्किटे हवी असल्याचे सांगितल्यावर इतर बिस्किटे दुसऱ्याला द्यायचे असल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्याने वीस लाख रुपये दिले आणि पुढे जाऊन सोने घ्या, असे त्याला सांगितले. रिक्षातून जात असताना कारमधून आलेल्या दोघांनी रिक्षा थांबवली. पोलिस असल्याचे सांगून सोन्याची बिस्किटे असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार पसार झाला तर व्यापाऱ्याला गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. पैसे आणि सोने घेऊन गेल्यानंतर व्यापाऱ्याने सर्वप्रथम संपर्क केलेल्या तरुणाला फोन लावला तर त्यानेही मोबाइल बंद ठेवला होता.
Read Latest Maharashtra News And Marathi News