कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर येथे झालेल्या बैठकीला प्रत्येक तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. एकूण १२० पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सकल मराठा महासंघाचे पदाधिकारी सुनील दळवी यांनी दिली आहे. कुणबी मराठा अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र नको तसा ठराव आज गुहागरमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण देताना राज्य सरकार समोर नवे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्या सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी चिपळूण येथे होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे मात्र अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसून राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सगळ्याच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. या गाव बंदीचा सामना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनाही करावा लागला आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना या गाव बंदीचा सामना करावा लागत आहे. मराठा समाजासाठी सरकारच्या असलेल्या शासकीय योजना समाजातील घटकांपर्यंत जाव्यात यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मराठा सामाजाची शिखर संस्था स्थापन करण्याचा निर्णय देखील आज गुहागर येथील बैठकीत जाहीर करण्यात आला आहे.
राज्य शासनाकडून सामाजिक सर्वे सुरू असून अशा स्वरूपाचा गावबंदीचा निर्णय घेऊन या गावबंदीतून नेमके काय साध्य होणार आहे, असा सवाल करत गाव बंदी या विषयाला आज गुहागर येथे झालेल्या बैठकीत आम्ही सगळ्यांनी मिळून कोकणातील मराठा समाजाच्या हितासाठीच विरोध केल्याची माहिती सुनील दळवी यांनी दिली आहे. मराठा समाजाला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी असलेल्या सारथी संस्थेचे कार्यालय रत्नागिरी जिल्ह्यात व्हावे, यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी शिखर संघटनेची बैठक नोव्हेंबर महिन्यात दापोली येथे होणार आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे, अशीही माहिती सुनील दळवी यांनी दिली आहे. या बैठकीला सुधीर भोसले, एड. संकेत साळवी एड. सौ. चव्हाण, कौस्तुभ सावंत, जानकी बेलोसे, संतोष घोसाळकर, किशोर दळवी, विनोद जाधव तसेच जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील क्षत्रिय मराठा समाजाचे एकूण १२० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती सुनील दळवी यांनी दिली आहे.