तेलंगणा पोलिसांचा महाराष्ट्राच्या टोकावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतरही महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील गोदावरी नदीवर मेडीगड्डा धरण उभारण्यात आले. दरवर्षी या धरणातील पाण्यामुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान होते. दरम्यान, २१ ऑक्टोबरला रात्री उशिरा अचानक मेडीगड्डा धरणावरील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांना जोडणारा गोदावरी नदीवरील पुलाचे २०, २१ व २२ क्रमांकाचे खांब खचले. त्यामुळे सायरनद्वारे सूचना देऊन दोन्ही बाजूंनी रस्ता वाहतुकीसाठी तातडीने बंद केला. त्यानंतर धरणाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
सिंचन विभागाचे तज्ज्ञ अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. सध्या युद्धपातळीवर दुरुस्तीकाम सुरू आहे. परंतु अचानक पाणी सोडल्याने आसरअल्ली, सोमनूर संगम, टेकडामोटला अशा १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना याचा फटका बसला. नदीकाठी सिचंनासाठी विद्युतपंप, पाईप, वायर या पाण्यात वाहून गेले. मिरची, कापूस उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
मेडीगड्डा प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील लोकांसाठी नुकसानकारक आहे. बॅकवॉटरमुळे दरवर्षी शेतीचे नुकसान होते. आता पूल खचल्याने अचानक विसर्ग केल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधित शेतकऱ्यांना तातडीन भरपाई द्यावी. कुठलीही पूर्व सूचना न देता पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके, पाळीव प्राणी वाहून जात आहे. त्याचा मोबदला द्यावा, असे सामाजिक कार्यकर्ते सूरज दुदीवार यांनी सांगितले. रात्री पुलाचाही भाग खचल्याचे निदर्शनास आल्यावर तातडीने रहदारी बंद केली. तेथे सिंचन विभागाकडून दुरुस्तीकाम सुरू आहे. नागरिकांना दक्षतेचे आवाहन केले आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे, असे सिरोंचाचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News