• Sun. Jun 7th, 2026
    ‘धर्म स्वातंत्र्य असलंच पाहिजे, 50 खोके देतो सांगून धर्मांतर करण्याला आमचा विरोध’, Uddhav Thackeray यांचा खोचक टोला

    उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्यातील गॅस टंचाईच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तसेच त्यांनी धर्मांतर विरोधी कायद्याला आपला पाठिंबा असल्याचं नमूद केलं. पण याचबाबत विचारलेल्या प्रश्नावरुन त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक करावी, अशी विनंती करणारं स्मरणपत्र दिलं. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी धर्मांतर विरोधी विधेयकावरही यावेळी प्रतिक्रिया दिली. “सालाबादप्रमाणे यंदाही विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहात नाही. मी आज माझ्या सहकारी आमदारांसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. हेच सांगितलं की, सालाबादप्रमाणे याही वेळेला दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक व्हायची आहे, याची आठवण करायला आलो आहोत. आपण आवश्य त्यासाठी नेमणूक करावी ही विनंती करतोय”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षांनी प्रस्ताव विचाराधीन असल्याचं म्हटल्याचं एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंना विचारलं असता, म्हणूनच सालाबादप्रमाणे म्हणालो, असा टोला ठाकरेंनी लगावला.

    “घरगुती गॅस सिलेंडरची कुठेही टंचाई नाही, असं मुख्यमंत्री म्हणत आहेत तर मग रांगा का दिसत आहेत? मला तर आपल्याच माध्यमातून माहिती मिळाली की, मुंबईतील 30 ते 40 टक्के रेस्टॉरंट बंद झाली आहेत किंवा होत आहेत. या सगळ्या गोष्टीत सर्वसामान्य माणूस होरपळत असेल तर जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेत फार मोठा गलथानपणा किंवा ती यंत्रणा सदोष आहे. जो जनतेचं दु:ख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीच आहेत, असं माणणारे मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले असतील तर राज्याचं कठीण आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

    ‘जनतेने सरकारला जागा दाखवावी’

    “सर्वपक्षीय बैठक ही बोलावण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की, शेवटी टंचाई आणि महागाई याच्यात फरक आहे. टंचाई ही टंचाई असते. पण महागाई म्हणजे किंमत का वाढते? दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी जसा आपल्या गॅस निर्मितीचा प्रयोग सांगितला होता तोही प्रयत्न अनेकांनी करुन बघितला आहे. असं काही नाही की फक्त टीका करत आहेत. पंतप्रधान जे सांगत आहेत ते सुद्धा लोकांनी करुन पाहिलं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच “जिथे निवडणुका राहिल्या आहेत तिथल्या जनतेने जागं होऊन सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे”, असं ठाकरे म्हणाले.

    शिवसेना उबाठा आंदोलन करणार?

    “गॅस टंचाईच्या विरोधात फक्त शिवसेनेने आंदोलनात उतरावं का? सगळ्यांनी उचरलं पाहिजे. शिवसेना ज्यांच्यासाठी उतरते त्या जनतेनेसुद्धा आमच्यासाठी उतरलं पाहिजे. शिवसेना तर सदैव लढणारी संघटना आहे. शिवसेना ही सदैव जनतेच्या हक्कांसाठी आणि ज्यांच्यामुळे व्यथा निर्माण होता त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर आहेच. आम्ही आंदोलनही करु. मात्र ज्यांच्या हातात सरकार आहे ते सरकार याबद्दल काय करणार आहे? युद्धाच्या बाबतीत नेमकं काय परिणाम होतात? काय दुष्परिणाम होतात? हे पंतप्रधान कधीतरी आम्हाला सांगणार आहेत की नाही?”, असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.

    धर्मांतर विरोधी कायद्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    “धर्मांतराचे विधेयक आज विधानसभेत मांडलं गेलं. त्यानंतर ते उद्या विधान परिषदेत मांडलं गेलं. धर्म स्वातंत्र्य प्रत्येकाला असलंच पाहिजे. कुणीही कोणत्याही परिस्थितीत जोरजबरदस्तीने किंवा कुणाच्या असाहयतेचा फायदा घेऊन लबाडीने आमिष दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेत. म्हणून या धर्मांतर विरोधी किंवा धर्म स्वातंत्र्य म्हणून काय ते विधेयकाला नेमकं नाव द्या. त्या विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच. पण धमक्या देणं, 50 खोके देतो सांगून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

    “त्या विधेयकात म्हटलं आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये फसवून धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पण गेल्या काही वर्षांत भाजपप्रणित सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. त्यामुळे हे भाजप सरकारचं अपयश आहे. तसेच नेमकं कोणत्या समाजात, कोणत्या विभागात अशा प्रकारचं धर्मांतर होत असेल त्याची माहिती दिली तरी आम्हाला सुद्धा सावध राहता येईल. आमचे सुद्धा कार्यकर्ते तिकडे तत्पर राहतील. कुणीही कुणावर जोरजबदरस्तीने धर्मांतर करत असतील तर त्याला आम्ही सुद्धा विरोध करु”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा