• Fri. Mar 20th, 2026

    ST Bus: एसटीच्या ‘ई-बस’ ठरत आहेत तोट्याचं कारण, दरवर्षी बसेल 1,489 कोटींचा फटका; महामंडळाची प्रकल्प रद्द करण्याची मागणी

    ST Bus: एसटीच्या ‘ई-बस’ ठरत आहेत तोट्याचं कारण, दरवर्षी बसेल 1,489 कोटींचा फटका; महामंडळाची प्रकल्प रद्द करण्याची मागणी

    ST E-Bus: एसटी महामंडळाच्या सध्या सुरू असलेल्या ई-बस प्रकल्पामुळे आतापर्यंत तब्बल 160 कोटींचा तोटा झाला आहे. दरवर्षी ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ई-बस प्रकल्प रद्द करावा अशी मागणी महामंडळाने सरकारकडे केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पर्यावरणपूरक वाहतूक ठरू शकणारा एसटी महामंडळातील ई-बस प्रकल्पच आता आर्थिक गळचेपीचे कारण ठरत असल्याचे सांगत एसटीने सरकारला घरचा अहेर दिला आहे. ५,१५० ई-बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या योजनेमुळे एसटीला दरवर्षी तब्बल १,४८९ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. सरकारकडून सहा महिन्यांपासून व्यवहार्यता पूरक निधी (व्हीजीएफ) प्राप्त झालेला नाही. यामुळे रोजचा कारभार हाकणे अशक्य असल्याने ई-बस योजना रद्द करावी, अशी भूमिका एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे मांडली आहे.

    17 मार्च रोजी विशेष बैठक

    ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू झालेले प्रवासी महामंडळ तोट्याचे आकडे पुढे करत निधीसाठी महत्त्वाच्या प्रकल्पांतून दबावतंत्र वापरत असल्याची चर्चा संघटनांमध्ये आहे. अशातच परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे. ई-बसच्या अडचणींबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १७ मार्च रोजी एका विशेष बैठक होत आहे.Maharashtra TimesPune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांपासून ‘फीडर बस’सेवेसाठी पावले, PMPला नवा पर्याय; पहिल्या टप्प्यात दोन मार्गांसाठी प्रस्ताव

    राज्य सरकारच्या ई-वाहन धोरण २०२१नुसार, नोव्हेंबर २०२१मध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापण्यात आली. या समितीच्या एसटी पुनरुज्जीवन आराखड्यातील शिफारशीनुसार एसटी ताफ्यातील १५ टक्के अर्थात, ५,१५० ई-बसगाड्या भाडेतत्त्वावर (जीसीसी मॉडेलवर) दाखल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. यासाठी २ नोव्हेंबर २०२३मध्ये एसटीने ‘ईव्हे ट्रान्स (एमएसआर) प्रा. लि.’ यांच्याशी करार केला.

    आतापर्यंत 160 कोटींचा तोटा

    या प्रकल्पांतर्गत सध्या धावत असलेल्या नऊ मीटर लांबीच्या ई-बसमुळे ६६.४४ कोटी आणि १२ मीटर लांबीच्या ई-बसमुळे ९४.८७ कोटी असा एकूण १६१.३१ कोटींचा तोटा झाला आहे. २०२६-२७ मध्ये अपेक्षित २,९०८ बसगाड्यांमुळे एकूण ७१८ कोटींचा तोटा अपेक्षित आहे. भविष्यात ५,१५० बसगाड्यांमुळे दरवर्षी १,४८९ कोटी रु. तोटा होण्याची भीती आहे.

    Maharashtra TimesPune Metro: मेट्रोतून उतरलं की रिक्षा तयार! पुण्यातील ‘नळ स्टॉप’ मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी नवी सुविधा; किती असेल भाडे?

    एसटीच्या ई-बससाठी राज्य सरकारने व्यवहार्यता पूरक निधी उपलब्ध करण्याची तयारी दर्शवली. जुलै २०२३ आणि सप्टेंबर २०२४ मध्ये ३,१८९ कोटींचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला. मात्र तो मंजूर झालेला नाही. यामुळे रोजचा कारभार करणे अशक्य असल्याचे सांगत ई-बस प्रकल्प रद्द करावा, असे राज्य सरकारला महामंडळाने सूचित केले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा