• Thu. Mar 19th, 2026
    मनोज जरांगे यांना खेळवणे हाच सरकारचा हेतू, प्रकाश आंबेडकरांची टीका, मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले..

    पुणे: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडे प्रामाणिकपणा नाही. मनोज जरांगे यांना खेळवत राहणे हाच सरकारचा हेतू असल्याचे दिसते, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली. येत्या २४ ऑक्टोबरला जरांगे काय निर्णय घेतात याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागून आहे. त्यातही सत्ता भोगलेले आणि सत्ताधारी यांना त्याची विशेष काळजी आहे. हे आंदोलन पुढे कसे वळण घेईल, याबद्दल त्यांनाच शंका आहे. याकडे आंबेडकर यांनी लक्ष वेधले.
    पक्षफुटीच्या वेळेस ढसाढसा रडले; आता उद्धव ठाकरेंना पत्र लिहून जिल्हाप्रमुखाची सोडचिठ्ठी, म्हणाले…
    जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल का याविषयी विचारता, अशा पद्धतीने आरक्षण मिळणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, अशा याचिकांना सर्वोच्च न्यायालय फार दाद देत नाही असा अनुभव आहे. यापूर्वी आरक्षण फेटाळताना न्यायालयाने आकडेवारीची मागणी केली होती. मात्र, ती देण्यात अपयश आल्याने आरक्षण रद्द झाले. मराठ्यांना आरक्षण नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे नाही. मात्र, आकडेवारीशिवाय आरक्षण मिळणार नाही, अशी न्यायालयाची भूमिका आहे. त्यात अजूनही एक बाजू शिल्लक आहे. त्याचा आधार घेतल्यास आरक्षण मिळू शकते,’ असेही मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

    अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या सभेसाठी सात कोटी रुपये कुठून आले असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर, ‘भायखळा येथे भाजी दुकान असणाऱ्या माणसाची पाच ते सहा हजार कोटींची मालमत्ता कशी झाली, असा प्रश्न भुजबळ यांना विचारावा. जरांगे यांना सभेसाठी लोकांनीच पैसे दिले होते अशी माझी माहिती आहे. त्यामुळे भुजबळ यांनी असा प्रश्न विचारताना आपल्याकडेही चार बोटे आहेत याची काळजी घ्यावी,’ असा टोला लगावला. जरांगे यांना लोकांची सहानुभूती आहे हे त्यांच्या सभेतून दिसत असल्याचे ते म्हणाले.

    मी डगमगणार नाही; फडणवीस साहेब इशारा देताय का? सुषमा अंधारे पत्रकार परिषदेत रडल्या

    अपात्र आमदारांच्या सुनावणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट झाली. त्यावर विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री बुचकळ्यात पडले असतील तर वकील म्हणून मी त्यांची बाजू मांडण्यास तयार आहे. त्यांनी मला सर्व माहिती द्यावी. काय मार्ग काढायचा ते मी त्यांना सांगतो. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे,’ असा दावा आंबेडकर यांनी केला. ‘शिवसेना – काँग्रेस, काँग्रेस – राष्ट्रवादी, शिवसेना – राष्ट्रवादी या त्रिकुटाने जागावाटपासंदर्भात त्यांचे त्यांनी बघून घ्यावे, असा सल्लाही यावेळी दिला. काँग्रेसने अद्याप आंबेडकर यांना सोबत घेतलेले नाही याबाबत विचारता, ‘हा प्रश्न काँग्रेसलाच विचारावा,’ असे मत व्यक्त केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed