• Fri. Mar 6th, 2026

    मराठवाड्यावर वरुणराजाची कृपा; पुढील दोन दिवस या चार जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस बरसणार

    मराठवाड्यावर वरुणराजाची कृपा; पुढील दोन दिवस या चार जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस बरसणार

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मागील २४ तासात शहरात ४१.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून शहरात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात सप्टेंबरपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ६४६ मिलीमीटर असून, आतापर्यंत ५२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. परतीच्या पावसामुळे पर्जन्य तूट भरुन निघेल, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले. हर्सूल तलावातही पाण्याची आवक वाढल्यामुळे शहरातील काही भागांचा पाणीप्रश्न मिटण्याची शक्यता आहे.

    मराठवाड्यातील पुढील तीन दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपातील पावसाचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात २६ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस होणार आहे. तब्बल अडीच महिने पावसाने दडी मारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. शहरी भागांतही कमी पावसाचे दुष्परिणाम दिसत होते. बोअरवेल्स आणि विहिरी कोरड्या पडल्या होत्या. तीन दिवस जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणी पातळीत वाढ होणे अपेक्षित आहे. परतीच्या पावसामुळे पर्जन्यमानाची तूट भरून निघणे अपेक्षित आहे. खरीप पिके वाया गेली असली तरी रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी ८८ टँकरद्वारे पुरवठा सुरू होता. मध्यम आणि लघु प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार आहे. या पावसामुळे खरीपातील उशिराच्या पिकांनाही फायदा झाला आहे. फळबागा आणि ऊस पिकासाठी परतीचा पाऊस उपयुक्त ठरला आहे. या पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी चार टक्क्यांनी वाढली असून सध्या ३६.३५ टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाने दिली आहे.

    विजा कडाडत असताना लॅंडलाईन की मोबाइल वापरावा? हवामान खात्याने दिली माहिती

    दरम्यान, मागील २४ तासांत विभागात २५.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जालना (३६.७), बीड (३०.३), लातूर (९.३), धाराशिव (९.४), नांदेड (१६.६), परभणी (२६.७), हिंगोली (१९.१) असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाळ्यात पहिल्यांदाच नद्या, ओढ्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या विहिरींची पाणीपातळी वाढल्यामुळे पुढील काही दिवसांसाठी पाणीप्रश्न मिटला आहे.

    वीस मंडळांत अतिवृष्टी

    मराठवाड्यात गेल्या २४ तासांत ५० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील २० मंडळांचा त्यात समावेश आहे. चित्तेपिंपळगाव मंडळात सर्वाधिक १५१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. भावसिंगपुरा (७५), कांचनवाडी (१११.२५), हर्सूल (७८), कचनेर (६७.२५), पंढरपूर (७६.७५), वरुड काजी (६५), आडूळ (८१.५०), पिंपळवाडी (७०.७५), बिडकीन (१२४.७५मिमी), डोणगाव (१०६.७५), वैजापूर (७०), शिवूर (१०६.७५), लोणी (६५), गारज (१२४), लासूरगाव (७१.५०), देवगाव (६५.५०), वेरूळ (१२५), आमठाणा (७०.२५), अंभई (११८.५०मिमी) अशी मंडळनिहाय नोंद झाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed