मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरातील पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाट्याजवळ हा अपघात झाला. रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हर्षद सुनील बुद्रुक (वय वर्ष २०) आणि त्याचा मित्र सुजल रामचंद्र बागणे (वय २०), (दोघे रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा, जि. सांगली) हे दोघे रविवारी दुचाकीवरून इंगळी येथील मामाकडे निघाले होते.
पुणे-बंगळुरू महामार्गावरून जाताना नागाव फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने हर्षदच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामुळे दोघेही काही अंतर फरफटत गेले. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेला सुजल बाजूला फेकला गेला आणि तो गंभीर जखमी झाला तर हर्षदच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना तत्काळ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच हर्षदचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर ट्रक चालकास ताब्यात घेऊन पोलिसांनी ट्रक जप्त केला, तर ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षद बुद्रुक हा तळसंदे येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तसेच तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचा वाळवा येथील तालुका अध्यक्षही होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजोबा असा परिवार आहे.