• Mon. Mar 16th, 2026

    Girl Education: मुलींसाठी मोफत शिक्षणाची घोषणा, पण तरीही घेतली फी; कॉलेजांवर आता कठोर कारवाई होणार, मंत्र्यांची घोषणा

    Girl Education: मुलींसाठी मोफत शिक्षणाची घोषणा, पण तरीही घेतली फी; कॉलेजांवर आता कठोर कारवाई होणार, मंत्र्यांची घोषणा

    Chandrakant Patil: ‘अर्न अँड लर्न’सारख्या नवीन योजनेतून सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपये अतिरिक्त मानधन देण्याची योजना राज्य सरकार आखत असल्याचेही पाटील म्हणाले. याअंतर्गत विद्यार्थी विद्यापीठ किंवा कॉलेजाच्या आवारात वृक्षारोपण, लायब्ररी व्यवस्थापन किंवा सामाजिक कामात मदत करतील. यासाठी शासन, कॉलेज आणि सामाजिक संस्था मिळून निधी उभारतील.

    मुलींसाठी मोफत शिक्षणाची घोषणा, पण तरीही घेतली फी; कॉलेजांवर आता कठोर कारवाई होणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण घेण्याचा क्रांतिकारक निर्णय या अगोदरच सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही अनेक कॉलेज मुलींकडून फी आकारली जात असल्याचे निदर्शानास आले. यापुढे अशा प्रकारे शिक्षण शुल्क आकारणाऱ्या कॉलेजांची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. त्याचवेळी अतिरिक्त शुल्काच्या माध्यमातून विद्यार्थिनींची फसवणूक केली जात असून, यापुढे अतिरिक्त शुल्कही नियामक समितीच्या अखत्यारित आणण्यात येणार असल्याचे पाटील यांनी या वेळी जाहीर केले.

    राज्यातील मुलींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आमदार रईस शेख यांनी शुक्रवारी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वरील घोषणा केली.

    पाटील म्हणाले, ‘राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक वेळखाऊ बाबी होत्या त्यांची सुलभता केली. शिष्यवृत्ती अर्जातील माहितीची संख्या १३८ वरून ६६पर्यंत कमी करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे १७ वरून आठवर आणली आहेत. आता सीईटी डेटा थेट वापरला जाणार असल्याने विद्यार्थ्यांना वारंवार जात प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. महाविद्यालयाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पहिल्या हप्त्याचे वितरण लवकर केले जाईल. शिष्यवृत्तीच्या वितरणाला पगारापेक्षाही अधिक प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जून महिन्यापासून याची अंमलबजावणी होईल.’

    निर्वाह भत्ता ही योजना शहरांच्या वर्गवारीनुसार विद्यार्थ्यांना १० महिन्यांसाठी वसतिगृह भत्ता दिला जातो. मुंबई-पुण्यासारख्या शहरांसाठी दरमहा ६,००० रुपये (एकूण ६०,००० रुपये), महसूल विभागाच्या ठिकाणी ५,१०० रुपये आणि तालुका स्तरावर ४,८०० रुपये दिले जात आहेत.

    ‘थकीत देयके वेळेवर अदा करण्यासाठी काही वित्तीय संस्थांशी (उदा. फेडरल बँक) चर्चा सुरू आहे. सरकार व्याज देईल आणि या संस्था थेट विद्यार्थ्यांचे किंवा महाविद्यालयांचे शुल्क अदा करतील. सरकारी योजनांचा लाभ मिळत असूनही जे कॉलेज विद्यार्थ्यांकडून अवास्तव इतर फी आकारतील किंवा प्रवेश प्रक्रियेत अडवणूक करतील, अशा महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल. फॉर्म भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी राज्यात ४० केंद्रे सुरू केली जात आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा