• Sun. Mar 15th, 2026
    Prakash Ambedkar: पंतप्रधान मोदींना पदावरुन हटवा! प्रकाश आंबेडकरांचा RSSच्या कार्यालयावर 23 मार्चला मोर्चा, काय म्हणाले?

    Prakash Ambedkar On PM Modi: कॉम्प्रमाइज झालेल्या पंतप्रधानाचा राजीनामा मागण्यासाठी धरणे धरणार आहोत, असे आंबेडकर म्हणाले.

    प्रकाश आंबेडकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: इस्त्रायल-इराण युद्धात भूमिका घेतली नसल्याने भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेकडे देशाचे सार्वभौमत्व गहाण टाकले आहे. मोदी यांना पंतप्रधान पदावरुन हटविण्याच्या मागणीसाठी आणि जाब विचारण्यासाठी २३ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयावर मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

    जागतिक पातळीवर भारतात चुकीची भूमिका घेत असल्याचा आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, आप आणि डावे पक्ष नागपूर येथे संघ मुख्यालयावर २३ मार्च रोजी मोर्चा काढणार आहेत. याबाबत ॲड. आंबेडकर यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: शासकीय अभियांत्रिकीत पेटली चूल! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे विद्यार्थ्यांची ‘को-ऑपरेटिव्ह’ खानावळ संकटात
    ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे ‘कॉम्प्रमाइज’ झाले असून त्यांनी देशाच्या विरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. एपस्टीन फाइलमध्ये मोदी यांचे नाव आहे. त्यांनी देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे. भारतावर आमची सत्ता आहे असे दाखविण्यासाठी अमेरिकेने रशियाकडून तेल विकत घेण्याची भारताला मुभा दिली आहे. आधीचे आदेश बंद करून नवीन आदेश दिले आहेत. मोदींना पंतप्रधान करण्यात आरएसएसची भूमिका होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आरएसएसने जशी भूमिका घेतली नाही, तशीच मोदींचे नाव एपस्टीन फाइलमध्ये आल्यानंतरही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आरएसएसला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढत आहोत,’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांचे पाठिराखे असलेल्या सवर्ण आणि मध्यमवर्गीयांनी भूमिका घ्यावी.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News : माफीनाम्यानंतरही तणाव, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांना जमावाकडून मारहाण
    दरम्यान, गॅसचा तुटवडा इस्त्रायल-इराण युद्धात भूमिका घेतली नसल्याने दिसत आहे. नागपूरचा मोर्चा निघण्यापूर्वी बँकांतील परिस्थितीही बिघडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मोदी यांना पंतप्रधान पदावरुन हटविण्याशिवाय पर्याय नाही, असे आंबेडकर म्हणाले. या पत्रकार परिषदेला युवा नेते सुजात आंबेडकर, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, नगरसेवक अफसर खान, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड आदी उपस्थित होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा