‘इंडिया’ आघाडीच्या तिसऱ्या बैठकीची सांगता शुक्रवारी मुंबईत झाली. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी आदी नेत्यांनी आपली भूमिका मांडली. जवळपास सर्वच नेत्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता. या नेत्यांनी मुख्यत्वे मोदी आणि केंद्रावर सडकून टीका केली.
सोनिया गांधी, राहुल गांधी, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, तेजस्वी यादव असे देशभरातील अनेक दिग्गज नेते मुंबईत आले होते. या वेळी बैठका, चर्चासत्रे यांच्या निमित्ताने या नेत्यांनी देशातील एकूण राजकारणावर सखोल चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्याने भाजप आणि नरेंद्र मोदी यांना कसे सत्तेबाहेर ठेवता येईल हाच या वेळच्या चर्चेचा गाभा राहिला. मात्र याबरोबरच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कसे महाराष्ट्रात भाजपला विरोध करीत आहेत, त्यांचा कसा ताकदीने मुकाबला करीत आहेत याविषयी यातील बहुसंख्य नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केल्याचे समजते.
उद्धव ठाकरेंबद्दल उत्सुकता
केंद्रातील सरकारकडून ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून ससेमिरा मागे लावला जात असतानाही त्याची कोणतीच भीती न बाळगता उद्धव ठाकरे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत आहेत. याविषयी ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि तेजस्वी प्रताप यादव यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना या नेत्यांना त्यांच्याविषयी बरीच उत्सुकता असल्याचेही त्यांच्या देखरेखीसाठी असलेल्या राज्यातील महाविकास आघाडीमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी अनुभवले.