साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भक्तांना आईचे दर्शन जवळून व्हावे यासाठी गाभाऱ्यातून दर्शन देण्याची व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आली होती मात्र कोरोना काळात सुरक्षेच्या कारणास्तव ही रांग बाहेरून म्हणजे पितळी उंबरा येथून वळविण्यात आली होती. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पितळी उंबराच्या आतून दर्शन पुन्हा सुरू करावे यासाठी भक्तांकडून अनेक निवेदन व विनंती करण्यात येत होती. अखेर तब्बल दोन ते अडीच वर्षानंतर पुन्हा अंबाबाईचे दर्शन आतून सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून याबाबतची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज केली आहे. यामुळे भक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून अंबाबाई मंदिरात देखील दर्शन रांगेत बदल आणि भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नेहमीच भक्तांची मोठी गर्दी असते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा देखील लागलेल्या असतात यामुळे कोरोना काळात संसर्ग अधिक वाढू नये यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार गाभाऱ्यातून भक्तांना दर्शन बंद करून पितळी उंबराच्या बाहेरून दर्शन सुरू होतं यानंतर संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने कोरोना चे सर्व नियम हटवल्यानंतर देखील मंदिर समितीकडून मंदिरात अनेक मंदिर सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने दर्शन रांगेत बदल करण्यात आला नव्हता. शिवाय अनेक व्हीआयपी लोकांना गाभाऱ्यात घेऊन जात असल्याने अनेक भक्तांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता तसेच सर्वसामान्यांना देखील गाभाऱ्यातून दर्शन सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती अखेर उद्यापासून हे दर्शन सुरू होणार असून भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.