प्रशासनाने गाव खाली करून स्थलांतरित होण्याचे आवाहन देखील केले होते. पण पशुपालन मुख्य व्यवसाय असल्यामुळे आपली गुरं, म्हैस, कोंबड्या, बकऱ्या हे पशु कसे राहतील या विवंचनेत नागरिकांनी घरे सोडली नव्हती. अखेर प्रशासनने संपूर्ण परिस्थिती समजावल्यानंतर गावातील लोक तयार झाले. प्रशासनाने त्यांचे स्थलांतर माथेरानमध्ये केले आहे.
गारबट हे ३५ ते ४० घरांचे गाव असून येथील ग्रामस्थ भातशेती करतात. येथील गावच्या बाजूला लागून असलेली शेतजमीन खचत चालली आहे. १०० फूट लांब आणि ८ ते १० फूट रुंद असा मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे शेतीचा काही भाग वाहून गेला असून शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खालापूर तालुका तहसीलदार आयुब तांबोळी व माथेरानचे तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुपगावचे तलाठी मधुसूदन पामपट्टवार, माथेरानचे पोलीस शिपाई दामोदर खतेले, आपदा मित्र दिनेश सुतार, अक्षय परब, उमेश मोरे यांच्यासह टीमने गारबट गाठून तेथील ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याची विनंती केली. पशुधन सोडून जाऊ शकत नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. मात्र जनावरांना खाद्य देऊन तुम्ही सुरक्षित स्थळी चला, असे सांगताच लोक तयार झाले.
स्थलांतरित नागरिकांना माथेरानच्या कम्युनिटी सेंटर येथे स्थलांतर करण्यात आले आहे. मयुर खुळे पुणे, अभिजित धोत्रे कळवा, संतोष शिंगाडे सारसाई या कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली व स्थलांतरासाठी मोठी मदत केली. या कार्यकर्त्यांनी ताडपत्री वगैरे आदी सुविधा या ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले आहेत.