जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी शेंडे, आदी अधिकारी उपस्थित होते.
यावर्षी आपत्ती काळात राजापूर येथील श्री शेळके या रिक्षा चालकावर झाड पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना शासकीय नियमानुसार तात्काळ १९ जुलै रोजी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच अन्य ३ जखमी महिलांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
तिवरे धरणाच्या बाबतीत आत्ता पर्यंत २४ घरे सिद्धिविनायक ट्रस्टच्या मदतीने बांधून देण्यात आली आहेत. उर्वरित ३० घरे सिडको अंतर्गत बांधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
अतिवृषटीमुळे जिल्ह्यातील २ अंगणवाडी, १६ प्राथमिक शाळा, ५६ साकव, १ आरोग्य उपकेंद्र यांचे नुकसान झाले आहे. १९२ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. ३४ गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. ३० सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाची माहिती देत असताना भात व नाचणीचे जमीन क्षेत्र ७९००० हेक्टर असून पैकी ६८००० हेक्टर भात लावणीचे क्षेत्र आहे तर १०३९८ हेक्टर नाचणी पिकाचे क्षेत्र आहे. पैकी यावर्षी भात पेरणी ७०.८८ टक्के एवढी झाली आहे तर नाचणी पेरणी ३८ टक्के एवढी झाली आहे.
सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील अतिवृष्टिमुळे ५२ गाव, ४८.५ हेक्टर जमीन क्षेत्र व २०१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.