ठाणे : बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील वालधुनी जकात नाक्याजवळ असलेल्या पुलावरून एका तरुणाने नदीच्या पाण्यात उडी घेतली. या घटनेची माहिती कळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाण्यात बेपत्ता झालेल्या या तरूणाला शोधून काढण्यासाठी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर हा तरूण पोलिसांच्या हाती लागला आहे.
आफताब नौशाद अन्सारी (२०, रा. अशोकनगर मशिदीजवळ वालधुनी, कल्याण-पूर्व) असं या तरुणाचं नाव आहे. या तरूणाने वालधुनी बौद्ध भूमी फाऊंडेशन शेजारील नदीच्या पात्रात उडी घेतली. मात्र, हा तरूण दूरवर नदीच्या काठी असलेल्या एका झाडाला अडकल्याचे काही रहिवाशांना आढळून आले. ही माहिती कळताच महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
आफताब नौशाद अन्सारी (२०, रा. अशोकनगर मशिदीजवळ वालधुनी, कल्याण-पूर्व) असं या तरुणाचं नाव आहे. या तरूणाने वालधुनी बौद्ध भूमी फाऊंडेशन शेजारील नदीच्या पात्रात उडी घेतली. मात्र, हा तरूण दूरवर नदीच्या काठी असलेल्या एका झाडाला अडकल्याचे काही रहिवाशांना आढळून आले. ही माहिती कळताच महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
या तरूणाला शोधून काढण्यासाठी गोपनीय, तपास पथक, बीट मार्शलसह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आधारवाडी आणि ड वॉर्डच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने शोध मोहीम राबवून या तरूणाला दुपारी ४ वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आले. या तरूणाने पुलावरुन नदीत उडी का घेतली? याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, या तरूणाची प्रकृती उत्तम असल्याने समुपदेशन करून त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचे वपोनि अशोक होनमाने यांनी सांगितले.