या घटनेच्या निषेधार्थ देशभर जैन बांधव मूकमोर्चा, उपोषण, बंद या मार्गांनी आंदोलन सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांनी रविवारी सर्वधर्मीय मूक मोर्चा काढून आचार्य कामकुमारनंदी महाराजांनी श्रद्धांजली वाहिली. सकल जैन समाजाच्या वतीने रविवारी सकाळी अकरा वाजता पैठण ते गांधी पुतळा या मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला. सकल जैन समाज, सकल मारवाडी महासभा व सकल हिंदू समाज बांधवांच्या प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘भारत हा ऋषी-मुनींचा, साधू ,संतांचा पवित्र देश आहे. परंतु गेल्या काही वर्षांत जैन व हिंदू साधू-संतांना त्रास देणे, मारहाण करणे, अपघात घडवून आणून गंभीर जखमी करणे किंवा त्यांची हत्या करणे अशा घटना वाढत आहेत. त्यात कर्नाटकात घडलेली घटना ही खूपच गंभीर आहे. देशात हजारो वर्षांपासून साधू-संत गावोगावी पायी भ्रमण करीत प्रवचनातून लोकांना धर्माबद्दल माहिती देतात, त्यांना अहिंसेचा पाठ शिकवतात, समाजाला सन्मार्गाला लावतात, मंदिरे व तीर्थक्षेत्रे बांधून भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. आता त्यांच्यावरच विघ्नसंतोषी, धर्मद्रोही लोकांनी हल्ले करून जैन व हिंदू संस्कृती संपविण्याचे काम हाती घेतल्याचे जाणवत आहे. सरकारने अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा दिली पाहिजे. देश चालविणाऱ्या नेत्यांनी अशा विघातक प्रवृत्तींना प्रतिबंध घातला नाही तर भविष्यात भारतीय संस्कृती व धर्म लयास गेल्याशिवाय राहणार नाही,’ अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
गांधी पुतळा, गांधी चौक याचे विनयांजली सभेत रूपांतर करण्यात आले. महावीर पाटणी यांनी प्रास्ताविक केले. सकल जैन समाज कार्याध्यक्ष सुभाष झांबड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी सिद्धार्थ मुनी महाराज , हंस बोधी विजयमुनी महाराज, सुयोग मुनी महाराज, यांनी आचार्य कामकुमारनंदी महाराजांना विनयांजली दिली. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. विलास साहूजी यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन केले. पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांना निवेदनाची प्रत सर्व साधुसंतांच्या उपस्थितीत सुभाष झांबड, महावीर पाटणी, आमदार प्रदीप जैस्वाल, शिरीष बोराळकर, जी. एम. बोथरा विलास साहुजी, झुंबरलाल पगारिया, दिगंबर क्षीरसागर, ललित पाटणी, अनिल संचेती, कौशिक सुराणा, सुधीर साहुजी आदींच्या हस्ते देण्यात आली.