• Sat. Mar 14th, 2026

    Tomato: टोमॅटो मिळाला नाही तर कोणी टाचा खुडून मेलेय का? ती जीवनावश्यक वस्तू नाही: सदाभाऊ खोत

    Tomato: टोमॅटो मिळाला नाही तर कोणी टाचा खुडून मेलेय का? ती जीवनावश्यक वस्तू नाही: सदाभाऊ खोत

    मुंबई: सध्या देशभरात टोमॅटोचे गगनाला भिडलेले भाव हे प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रातही घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत टोमॅटोने किंमतीचा उच्चांक गाठला आहे. सध्या बाजारपेठेत एक किलो टोमॅटोसाठी १५० ते १६० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये रोष वाढला असून यासाठी सरकारला जबाबदार धरले जात आहे. मात्र, माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरुन आक्रोश करणाऱ्या शहरी नागरिकांना फटकारले. टोमॅटो मिळाला नाही म्हणून लगेच दोन-चार जण टाचा खुडून मेलेत का, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला. सदाभाऊ खोत यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

    आंध्र प्रदेशातील टॉमॅटोची ग्राहकांना भुरळ; खरेदीसाठी गर्दी, पण ‘स्पेशालिटी’ नेमकी आहे तरी काय?

    ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’शी बोलताना सदाभाऊ खोत यांनी टोमॅटोच्या वाढलेल्या दरांविषयी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, टोमॅटो आता स्वीस बँकेत ठेवायला पाहिजेत. रयत क्रांती संघटनेने मविआ सरकारच्या काळात दूध आणि बैलगाडी आंदोलन केले होते. आता आमचं सरकार असूनही २२ मे रोजी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यात्रा काढली होती. टोमॅटो हा काही अॅटम बॉम्ब नाही. जरा दोन-तीन महिने कड मारा. त्यानंतर ज्याला ज्याला लय टोमॅटो लागतात, त्यांना आम्ही सरणाला पण टोमॅटो देऊ. मग सरणासाठी लाकडं वापरुच नका, जाळण्यासाठी फक्त टोमॅटोच वापरा. आपल्याकडे काय फक्त टोमॅटोच आहेत का, फ्लावर हाय, कोबू हाय, बटाटू हाय, घेवडा हाय, शेवगा हाय, उडीद हाय, मूग हाय. टोमॅटो मिळाला नाही म्हणून दोन-चार जण टाचा खुडून मेली आहेत का? टोमॅटो काय जीवनावश्यक वस्तू आहे का, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला.

    भाव खाणाऱ्या टोमॅटोला बाऊन्सर्सची सुरक्षा; पोलिसांनी भाजीवाल्याला उचललं; प्रकरण काय?

    २०१४ पूर्वी मी सांगितलं होतं कांदा परवडत नसेल तर टोमॅटो खावा, आता सांगतो टोमॅटो नाय तर कांदा खा. स्वस्ताईच्या काळात टोमॅटो ज्यूस करून घरात बॅरेल भरून ठेवा. टोमॅटोच्या ज्यूसने काय आंघोळ करायची असते का? शेतकऱ्याची जी वस्तू महागली की त्याच्या नावाने असा दंगा करायचा, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाची माती झाली पाहिजे. गेल्यावर्षी आठ आणे, पाच आण्याला टोमॅटो होता, चिखल झाला होता. तेव्हा कोणीही बोललं नाही. पण आता भाव वाढला तर सगळेजण बोलत आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed