Indian Railway: गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम प्रवाशांच्या खाद्यपदार्थांच्या सेवेवर होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम आशियातील युद्धामुळे देशात व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला. याची झळ आयआरसीटीसीच्या ‘बेस्ड किचन’लादेखील बसली. येथे लाखो प्रवाशांचे जेवण आणि नाश्ता तयार केला जात होता. गॅस उपलब्ध नसल्याने खाद्यपदार्थांची सेवा खंडित झाली होती. यावर पर्याय म्हणून आयआरसीटीसीने ‘रेडी टू ईट’ प्रकारातील हवाबंद खाद्यपदार्थ प्रवाशांना देण्यास सुरुवात केली.
Lakhpati Didi Yojana : ग्रामीण रणरागिणींची दमदार भरारी; 37 लाख ‘लखपती दीदी’, आता 25 लाख नव्या उद्योजकांचं लक्ष्य
गॅस तुटवड्यामुळे अनेक हॉटेल-खाणावळी ‘इंडक्शन’च्या पर्यायाकडे वळल्या आहेत. आपत्कालीन स्थितीमध्ये रेल्वेगाड्यांतील पॅण्ट्री डब्यात ‘फ्लेमलेस कुकिंग’ पद्धतीचा वापर करून जेवण तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सुरक्षा व नियमांचे काटेकोर पालन करत त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना कॅटरिंग विभागाचे संचालक, रेल्वे मंडळ ए. रंगराजन यांनी आयआरसीटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांसह देशातील सर्व झोनमधील प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांना (पीसीसीएम) पत्रातून दिल्या आहेत.
‘आपत्कालीन स्थितीत आयआरसीटीसीने जास्तीत जास्त प्रवाशांना जेवण मिळावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पर्यटन मार्गांवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील खाद्यपदार्थ सेवा अबाधित राहण्यासाठी आवश्यकतेनुसार थांबा आणि जनरेटर डब्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,’ अशा सूचनाही रेल्वे मंडळाने दिल्या आहेत.
Maharashtra Schools: शाळांना मराठी अनिवार्यच! विषय वगळणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
रोज साडेचार लाख प्रवाशांना जेवण
‘मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रोज सरासरी साडेचार लाख प्रवाशांना खाद्यपदार्थ देण्यात येतात. यापैकी ४० टक्के जेवण तयार करून पुरवण्यात येते. ४० टक्के जेवण ‘रेडी टू ईट’ अर्थात हवाबंद पाकिटांमधील आहेत. उर्वरित २० टक्के ‘स्नॅक्स’ आणि पेय स्वरूपातील आहे.
