सत्तेचा वाटाच जर मिळणार नसेल तर सत्तेचा फायदा काय? असा सवाल शिंदे गटाचे नाराज आमदार बैठकीत विचारत आहेत. दादांची महायुतीत एन्ट्री झाल्यापासून शिंदे गटाच्या आमदारांची मोठी गोची झालीये. सांगताही येईना-बोलताही येईना अशी त्यांची अवस्था झाली आहे. पण अशाही परिस्थितीत संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना नाराजीला मोकळी वाट करुन दिलीये. दुसरीकडे अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करतात, असा आरोप करुन सेना आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. त्या आरोपांचं आता काय होणार? याचंही टेन्शन शिंदेंच्या आमदारांना आहे.
संजय शिरसाट म्हणाले, आधी दोन पक्षांची युती झाली होती. पण राष्ट्रवादी तिसरा पक्ष अचानक सत्तेत आला. तेव्हा त्यांनाही सत्तेचा वाटा देणं गरजेचं आहे. तो वाटा त्यांना दिलेला आहे. पण सत्तेचा वाटा त्यांना लगोलग दिल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. शेवटी सत्ता ही कशासाठी हवी असते तर लोकांची कामे करण्यासाठी मग सत्तेत असूनही लोकांची कामे करण्यासाठी अडचणी येत असतील तर त्याचा काय उपयोग? असा रोकडा सवालही शिरसाट यांनी विचारला.
राष्ट्रवादी सोबत यायला नको होती, असं नाही. राष्ट्रवादी सोबत आल्याने आमची ताकद नक्कीच वाढली आहे. ही वाढलेली ताकद लोकसभेमध्ये नक्कीच दिसेल, येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसेल. शेवटी राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिलाय. त्यांनाही काहीतरी अपेक्षा असेलच की… असंही सांगायला संजय शिरसाठ विसरले नाहीत.
शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेना आमदारांची मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी का करुन घेतलं, याचं महत्त्व ते आमदारांना सांगतील तसेच नाराज आमदारांची समजूत काढण्याचा ते प्रयत्न करतील. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा शब्द देऊन मुख्यमंत्री नाराज आमदारांचं मन वळविण्याचा प्रयत्न करतील.
बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं स्वागत करुन ते तडकाफडकी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. नाराज आमदारांची चर्चा त्यांच्या कानावर आल्याने त्यांनी तातडीने मुंबईकडे धूम ठोकली.