अजित पवार यांच्या शपथविधीदरम्यान मुंबईतील बेलार्ड पियर येथील पक्षाच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व काही पवार समर्थक पुढील रणनीती ठरवत होते. शपथविधी पार पडल्यानंतर पुण्यात शरद पवार यांच्याशी संपर्क साधून पुढील रणनीतीबाबत या नेत्यांची चर्चा झाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेतेपद देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे देण्यात आल्याचेही सांगितले. मात्र, काँग्रेसमधील दिग्गजांनी ‘मटा’शी बोलताना याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.
‘सुपारी फुटायच्या आधीच बुंदी खायची घाई बरी नव्हे’, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना दिली. या कठrण प्रसंगी खरेतर महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल, अशीच विधाने करणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रवादीला इतका मोठा धक्का बसूनही त्यांची पूर्वापार सुरू असलेली प्रथा ते सोडायला तयार नाहीत, असेही काँग्रेसच्या दुसऱ्या एका नेत्याने सांगितले.
काँग्रेसच्या पवित्र्याकडे लक्ष
विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के सदस्य असावे लागतात. तसेच विरोधी बाकांवर एकापेक्षा अधिक पक्ष असल्यास त्यातील सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळते. अजित पवार यांच्यासोबत ३० सदस्य गेल्यास ५४पैकी २४ सदस्यच पवार यांच्यासोबत उरतील. असे असताना आव्हाड यांनी विरोधी पक्षनेतेपदी स्वतःचे नाव सांगितल्याने आता काँग्रेस यावर काय करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ज्यांच्याकडे आमदारांची संख्या अधिक असेल त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद जाईल, असं रात्री उशिरा स्पष्ट केलं.