‘अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या धोरणाविरोधात पाऊल उचलले असल्याने त्यांची कृती बेकायदेशीर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन केलेली कृती आहे. एका सदस्याने याची तक्रार केली असून ती राष्ट्रवादीच्या शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहे. आज आम्ही सर्व माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. नऊ आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे. त्यामुळे सत्तेत सहभागी झालेल्या नऊ आमदारांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंबंधी आम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मेल केला असून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं,’ असं जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवार आणि जयंत पाटलांकडून अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात कठोर पाऊल उचलण्यात आल्याने राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अजित पवारांसोबत कोणी-कोणी शपथ घेतली?
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील अशा राष्ट्रवादीच्या अन्य आठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीतील अस्वस्थतेबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सर्वप्रथम वृत्त दिल्यानंतर प्रसारमाध्यमांमधून पक्षफुटीबाबत गेले दोन महिने चर्चा सुरू होती. शनिवारपर्यंत कुणाला फारशी कुणकुणही लागू न देता शनिवारी एकूण नऊ जणांनी शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवनात राष्ट्रवादीच्या नऊ जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.