• Sat. Sep 21st, 2024

राष्ट्रवादीचं अखेर कठोर पाऊल: सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांना दणका; जयंत पाटलांची घोषणा

राष्ट्रवादीचं अखेर कठोर पाऊल: सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांना दणका; जयंत पाटलांची घोषणा

मुंबई : गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्राने सूरत-गुवाहाटीचा प्रवास करून राज्यात सत्तांतर झालेल्या नाट्याचा पहिला प्रवेश अनुभवला होता. त्यानंतर गेले वर्षभर न्यायालयीन लढाया, निवडणूक आयोगातील संघर्ष सुरू आहे. असे असतानाच राज्याच्या सत्तानाट्याचा पुढील प्रवेश रविवारी सादर झाला. गेल्या काही महिन्यांपासून नाराजीची चर्चा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. दुपारी अडीच वाजता अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पवार यांच्याबरोबर इतर आठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याने पक्षातील मतभेद उघड झाले असून रात्री उशिरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या धोरणाविरोधात पाऊल उचलले असल्याने त्यांची कृती बेकायदेशीर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन केलेली कृती आहे. एका सदस्याने याची तक्रार केली असून ती राष्ट्रवादीच्या शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहे. आज आम्ही सर्व माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. नऊ आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे. त्यामुळे सत्तेत सहभागी झालेल्या नऊ आमदारांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंबंधी आम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मेल केला असून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं,’ असं जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

NCP Split : राष्ट्रवादीच्या फुटीची बीजे एप्रिलमध्येच… शरद पवारांच्या साक्षीनेच! अखेर ते घडलं कारण..

दरम्यान, शरद पवार आणि जयंत पाटलांकडून अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात कठोर पाऊल उचलण्यात आल्याने राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अजित पवारांसोबत कोणी-कोणी शपथ घेतली?

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील अशा राष्ट्रवादीच्या अन्य आठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीतील अस्वस्थतेबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सर्वप्रथम वृत्त दिल्यानंतर प्रसारमाध्यमांमधून पक्षफुटीबाबत गेले दोन महिने चर्चा सुरू होती. शनिवारपर्यंत कुणाला फारशी कुणकुणही लागू न देता शनिवारी एकूण नऊ जणांनी शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवनात राष्ट्रवादीच्या नऊ जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed