“ज्या माणसाने तुम्हाला मोकळं मैदान दिलं, त्या माणसाच्या उतारवयात त्यांना हे दिवस दाखवले…? जे मंत्री राहिले त्यांनी आमदार तरी निवडून आणले का? साहेबांनीच भाषणं करायची. त्यांनीच जनतेत फिरायचं, आमदार निवडून आणायचे आणि तुम्हाला मंत्रालयात बसवायचं. असं सगळं केल्यानंतर उतारवयात त्यांच्या वाट्याला काय तर हे असं दिवस”, असं बोलताना जितेंद्र आव्हाडांचा कंठ दाटून आला.
मेलो तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही – आव्हाड
“ज्या बापाने मुलांना सगळं दिलं, काही मागायची गरज पडली नाही, फोनवर मंत्री केलं, पण त्याच बापाच्या उतारवयात पोरांनी असा निर्णय घेतला. आज महाराष्ट्राच्या घराघरात दु:खाची छटा असेल. मला अजितदादांकडून कुणीही सोबत येण्याविषयी विचारलं नाही. ते बरंच झालं. कारण मी मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, हे मी किती वेळा सांगून झालंय.”
“एखाद्या पोराने म्हाताऱ्या बापाला घराबाहेर काढावं, तशी आता परिस्थिती झालीये. माणुसकी जिवंत असेल तर हृदयाला चिमटा बसत असेल ना की हे आपण काय करतोय… आपण इतके निष्ठूर… इतके संवेदना विसरलेलो झालो आहोत की आपल्याला काहीच वाटत नाही? दु:खाची एक छटाही तुमच्या तोंडावर दिसत नाही. सहा तारखेला बैठक होती ना… त्याच्याआधीच एवढी घाई…? सहा तारखेच्या बैठकीत सांगितलं असतं साहेब आम्ही असं असं करणार आहे. त्यांनी सांगितलं असतं, करा बाबा-माझं काही म्हणणं नाही. पण बैठक ठेवायला सांगून त्यांनीच असा निर्णय घेतला- यावर आता काय बोलायचं…?”, असंही आव्हाड म्हणाले.