• Sat. Sep 21st, 2024

निवडणुकीसाठी हातघाई! डिसेंबरअखेर ७५० कोटी खर्च करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी

निवडणुकीसाठी हातघाई! डिसेंबरअखेर ७५० कोटी खर्च करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी मंजूर सुमारे ७५० कोटी रुपयांचा निधी डिसेंबर अखेरपर्यंत खर्च करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी संध्याकाळी नियोजन बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना मंजूर कामे शंभर टक्के मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे येत्या निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजनच्या माध्यमातून विकास निधी खर्च करण्यासाठी हातघाईवर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका रखडल्या असून आगामी वर्षांत लोकसभा आणि विधानसभेच्याही निवडणुकांचे पडघम वाजणार आहे. निवडणूक आचारसंहिता आणि निवडणुकांच्या कार्यकाळात शहराच्या विकास कामांचा पुरता बोजवारा उडत असल्यामुळे विकास निधी पडून राहण्याचा धोका उद्भवत असून असा अखर्चित निधी पुन्हा शासनाकडे जाण्याची शक्यता असते. जिल्ह्यात यंदा सुमारे १३२ कोटींचा अतिरिक्त निधी आला असताना त्याचा पुरेपूर वापर विकास कामांसाठी होण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे तसेच जुलै अखेरपर्यंत मंजूर कामांचे अंदाजपत्रक तयार करून सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या आहेत. अशा मंजूर कामांना ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत कार्यादेश देऊन ही कामे सुरू करण्यात येणार आहेत. शिवाय ही कामे दर्जेदार व्हावीत, याचेही निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, निवडणुकांपूर्वी आपल्या लोकप्रतिनिधींच्या सोयीची कामे करून घेणे, मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे आणि अन्य लाभ उठवण्याच्या दृष्टीने निवडणुकीपूर्वी कामे पूर्ण करण्याची घाई सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू झाला आहे. घाई केल्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांचा दर्जा घसरण्याचा धोकाही व्यक्त केला जात आहे.

यासाठी निधी

– जिल्हा परिषदेच्या योजना, आरोग्य सुविधा, नगरपालिका क्षेत्र, शाळा दुरुस्ती, महिला व बालकल्याण, पोलिस यंत्रणा, गतिमान प्रशासन यासाठी यंदा वाढीव निधी मंजूर झाला आहे.
– गड किल्ले संवर्धनासाठी जिल्ह्यास १६ कोटी रुपये मंजूर
– महिला सक्षमीकरणासाठी जिल्ह्यात महिला बचत गटांची संख्या वाढवणार
-असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष यंत्रणा उभारणार

‘पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षता घ्या’

पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना पर्यायी जागेत स्थलांतरित करून ती इमारत निष्कासित करण्याची कार्यवाही तातडीने करावी. यासाठी गरज पडल्यास पोलिस यंत्रणांनी मदत करावी. तसेच नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, विद्युत वाहिन्यांवरील झाडांचे फांद्या कापणे ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ते बंद पडणे, वाहतूककोंडी होणे या घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करावे. तसेच अशा घटना घडल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.
पाऊस लांबल्याने ठाणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचं सावट, काही दिवस पुरेल इतकाच जलसाठा
पालकमंत्र्यांना पुन्हा उशीर

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गेल्या वर्षभरामध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यंत मोजक्या बैठका झाल्या असून त्या बैठकांना देसाई उशिरा आल्याचे चित्र होते. बुधवारीही पालकमंत्री उशिरा आल्यामुळे नियोजित बैठकीसाठी अधिकारी वर्गाला मोठी प्रतीक्षा करावी लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed