• Mon. Mar 16th, 2026
    वाद मिटणार, तक्रादारांची धावपळ थांबणार; मध्य रेल्वेवरील १० रेल्वे स्थानकांमध्ये पोलिस चौक्या उभारणार

    मुंबई : रेल्वे स्थानक परिसरात वाद झाल्यावर तक्रारदार प्रवाशांना पोलिस ठाणे गाठावे लागते. त्यांची ही धावपळ थांबवण्यासाठी, मध्य रेल्वेवरील १० रेल्वे स्थानकांमध्ये पोलिस चौक्या उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन आणि मुंबई लोहमार्ग पोलिसांनी घेतला आहे. तसेच, सध्याच्या पोलिस ठाण्यांचा बकालपणा दूर करत पोलिसांना काम करण्यायोग्य वातावरण निर्माण व्हावे, याकरिता पोलिस ठाण्याच्या दुरुस्तीसाठी पोलिस ठाण्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.मुंबई महानगर प्रदेशातील जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे. रेल्वे मार्गिकांचा वाढता विस्तार आणि वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेता पोलिस ठाण्यांची संख्या कमी आहे. यामुळे पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर प्रवाशांचीदेखील धावपळ होते. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये पोलिस चौक्या उभारण्यात येणार आहेत. प्रवाशांना तक्रार किंवा चौकशी करण्यासाठी या चौक्यांचा वापर होईल. याचबरोबर रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांना कपडे बदलणे, विश्रांती, छोटेखानी बैठका अशी कामे या चौक्यांमधून करता येणार आहेत.

    ‘लोकमान्य टिळक टर्मिनस, भायखळा, टिळकनगर, घाटकोपर, सँडहर्स्ट रोड, कसारा आणि अंबरनाथ या मध्य रेल्वेवरील १० रेल्वे स्थानकांत चौक्या उभारण्यात येणार आहेत. त्या सुसज्ज पोर्टा केबिन स्वरूपात असणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्थानकांतही अशा चौक्या उभारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी सकारात्मक बोलणी सुरू आहेत’, असे मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

    मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी! हक्काच्या घरकुलांसाठी लवकरच धोरण निश्चित, उपमुख्यमंत्र्याची माहिती
    नूतनीकरणासाठी १० लाख

    रेल्वे पोलिस ठाण्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. यामुळे या ठाण्यांच्या नूतनीकरणासाठी १० लाखांपर्यंतच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून हा निधी देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, वडाळा, ठाणे, डोंबिवली, कल्याण, वाशी, पनवेल आणि कर्जत पोलिस ठाण्यांचा यात समावेश आहे. संबंधित पोलिस ठाण्याची स्थिती पाहून किमान पाच ते कमाल १० लाख असा खर्च करण्यात येणार आहे.

    अमृत भारत योजनेंतर्गत मुंबईतील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यावेळी स्थानकांतील पोलिस ठाण्यांनाही प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली जाईल. याचा फायदा रेल्वे पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ८० लाख रेल्वे प्रवाशांना होणार आहे.
    – डॉ. रवींद्र शिसवे, आयुक्त, मुंबई लोहमार्ग पोलिस

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed