• Wed. Mar 11th, 2026

    राज्यासाठी धोक्याची घंटा! हवामान बदलांचा परिणाम, यंदा पावसाळ्यात संकट वाढण्याची भीती; तज्ज्ञ सांगतात…

    राज्यासाठी धोक्याची घंटा! हवामान बदलांचा परिणाम, यंदा पावसाळ्यात संकट वाढण्याची भीती; तज्ज्ञ सांगतात…

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : हवामान बदल होत आहे. त्याचे परिणाम रोज आपल्यावर होत आहेत. यातील काही परिणाम दृश्य, तर काही अदृश्य आहेत. येणाऱ्या काळात विजा चमकण्याचे प्रकार वातावरण बदलामुळे अधिक वाढू शकतात. हे परिणाम सर्वात जास्त धोकादायक आहेत. हवामान विभागाच्या पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘मटा कट्टा’ या उपक्रमामध्ये विजांपासून निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल माहिती दिली.हवामान बदल, विजा, रडार, हवामानाचा अंदाज, त्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर त्यांनी यावेळी आपले विचार मांडले.
    ग्रामीण भागांमध्ये विजा पडून शेळ्या, मेंढ्या यांचे कळपच्या कळप मृत्युमुखी पडतात, विजा पडून माणसांचे मृत्यू होतात, यासाठी ही वातावरणीय घटना अधिक हानीकारक आहे. यामुळे जीवितहानीसोबत वित्तहानी या दोन्ही परिणामांना सामोरे जावे लागते. पूर्वी पाऊस येण्याआधी आणि पाऊस जाताना विजा चमकायच्या. मात्र, आता पावसाळ्याच्या मध्येही विजा चमकतात. एखाद्या ढगाची त्या ढगाच्या तळापासून वरपर्यंत उंची अधिक असते, तेव्हा त्यामध्ये विजा चमकण्याची शक्यता अधिक असते, असे त्यांनी सांगितले.

    ढगाची उंची जेव्हा १० ते १२ किलोमीटर असते तेव्हा विजांचे प्रमाण अधिक असते. या विजांचे चार प्रकार असतात. ढगांमध्ये विजा निर्माण होतात, त्या एका ढगातून दुसऱ्या ढगात प्रवाहित होतात, ढगांमधून जमिनीकडे आणि जमिनीकडून ढगांकडे विजा प्रवाहित होतात. यात ढगांमधून जमिनीकडे प्रवाहित होणाऱ्या विजा या अधिक घातक असतात, असे होसाळीकर यांनी स्पष्ट केले. एखाद्या भागात पडणारा पाऊस, स्थानिक भागात काही तास प्रचंड प्रमाणात कोसळणारा पाऊस, यासाठी कारणीभूत असलेले क्युमुलोनिंबस ढग यासंदर्भातही त्यांनी माहिती दिली.

    गेल्या काही काळात पाऊस पडण्याच्या प्रमाणात काही बदल झाले आहेत. पावसाच्या आगमनाच्या आणि परतीच्या वेळेतही बदल झाले आहेत. चेरापुंजी, मौसिनराम यांसारख्या सर्वाधिक पावसाच्या ठिकाणी पडणारा पाऊस कमी होत जात असल्याचे दिसत आहे. राजस्थानसारख्या ठिकाणी पूर येत आहेत. किनारपट्टी भागांमध्ये उष्णतेच्या लाटा यापूर्वी कधीही अनुभवल्या नव्हत्या. त्या उष्णतेच्या लाटांचा अनुभव मुंबईसारख्या शहरातही येत आहे. हे वातावरण बदलाचे परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    वातावरण बदलाचा वेग कमी करण्यासाठी कर्ब उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न सध्या सगळे देश करत आहेत. हा वेग थोडा कमी झाला की, अधिक संशोधनासाठी वेळ मिळेल, या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने वातावरण बदलावर उपाय शोधण्यासाठीही प्रयत्न होतील. या दृष्टीने हा वेग कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

    पावसाळ्यासाठी मुंबई सज्ज? ५०० फोटो व्हायरल करत ‘आप’चा सवाल, फोटो बघून तुम्हालाही प्रश्न पडेल
    वीज पडून १२ जणांचा मृत्यू

    रांची : झारखंडच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांत वीज कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. झारखंड सरकारने वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची भरपाई दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed