• Wed. Jul 29th, 2026

    मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा मिळणार! ७ स्थानकांवरील २० फलाटांची उंची वाढवणार; अपघातांचा धोका कमी होणार

    मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा मिळणार! ७ स्थानकांवरील २० फलाटांची उंची वाढवणार; अपघातांचा धोका कमी होणार

    Central Railway: मुंबईतील लोकलमधील प्रवाशांचे अनेकदा ट्रेन आणि फलाटांमधील अंतरामुळे अपघात होतात. त्यामुळे फलाटांची उंची वाढवून अंतर कमी करण्याची मागणी केली जात होती. आता मध्य रेल्वेने या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: लोकल आणि फलाट यांच्यातील जीवघेण्या पोकळीबाबत प्रवाशांनी सातत्याने केलेल्या तक्रारींना ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वाचा फोडल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ही पोकळी कमी करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. भायखळा, दादर, कुर्ला, मुलुंड, ठाणे, मानखुर्द आणि कळवा या सात स्थानकांतील फलाटांची उंची वाढविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. मात्र उर्वरित महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे काय, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

    ‘महाराष्ट्र टाइम्स’ने २४ जुलै रोजीच्या अंकात ‘पोकळी ही जीवघेणी’ या मथळ्याखाली मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील लोकल आणि फलाटांमधील धोकादायक अंतराचा मुद्दा ठळकपणे मांडला होता. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) यांना या समस्येकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ‘फलाटांची उंची वाढविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत’, अशी माहिती वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) यांनी दिली. यामुळे आता सात रेल्वे स्थानकांतील एकूण २० फलाट उंच होणार आहेत.

    Maharashtra TimesMumbai Local: महामुंबईत रेल्वेविस्ताराचे लक्ष्य; पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचाही विकास

    ‘भायखळ्यातील सर्वच फलाटांवर ही समस्या जाणवते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटांच्या सुरुवातीच्या भागातही लोकल आणि फलाटामधील अंतर खूपच जास्त आहे. त्यामुळे गाडीतून चढणे-उतरणे धोकादायक ठरते. गुडघ्यांचा किंवा पायांचा त्रास असलेल्या प्रवाशांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो’, असे प्रवासी मोहन काळे यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अनेक स्थानकांवर लोकल आणि फलाट यांच्यातील पोकळीची समस्या गंभीर आहे. मात्र, सध्या केवळ सात स्थानकांतील २० फलाटांवरील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘सात स्थानकांतील प्रवाशांचीच सुरक्षा महत्त्वाची आहे का? उर्वरित स्थानकांतील जीवघेणी पोकळी कधी कमी होणार?’, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

    ठोस कालबद्ध आराखड्याची गरज

    मध्य रेल्वेने या गंभीर प्रश्नाची दखल घेतली असली, तरी ही केवळ सुरुवात ठरू नये, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. फलाट आणि लोकलमध्ये धोकादायक अंतर असलेल्या सर्वच स्थानकांचे सर्वेक्षण करून, टप्प्याटप्प्याने नव्हे तर ठोस कालबद्ध आराखडा तयार करून ही समस्या कायमची दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

    Maharashtra TimesPune News: पुण्यात सार्वजनिक वाहतुकीला गती, उन्नत मार्गावर मेट्रोसारखी वेगवान E-RTS यंत्रणा, खाली वर्तुळाकार मार्गाने कोंडी फुटणार

    ‘मेमू’ घसरल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत

    पश्चिम रेल्वेवरील गुजरात राज्यातील भिलाड रेल्वे स्थानकाजवळ डाऊन मार्गावर विरार-भरूच मेमू रुळांवरून घसरल्याने सोमवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे चार ते पाच तास विस्कळीत झाली. या घटनेमुळे गुजरात, राजस्थान आणि दिल्लीकडे जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस, सुपरफास्ट, पॅसेंजर आणि मेमू गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही एक ते दोन तास उशिराने धावत होत्या. विरार स्थानकातून पहाटे ४ वाजता सुटलेली विरार-भरूच मेमू नियोजित वेळेत रवाना झाली. मात्र, सकाळी ६च्या सुमारास भिलाड स्थानकाजवळ पोहोचल्यावर ती अचानक रुळांवरून घसरली. त्यामुळे डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक कोलमडली. परिणामी, नोकरदार, विद्यार्थी आणि कामगारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा