माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी लोकसभेत रामटेक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. भाजप-शिवसेना युतीच्या काळात हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे होता. सेनेने १९९९ साली खाते उघडले. २००९ सालचा अपवाद वगळता काँग्रेसला यश मिळाले नाही. २००९ साली अनुसूचित जातीसाठी मतदारसंघ राखीव झाला. पहिल्यांदा मुकुल वासनिक निवडून आले.
२०१४ पासून कृपाल तुमाने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सेनेत फूट पडल्यानंतर ते शिंदे गटात गेले. येत्या निवडणुकीत संधी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. ही जागा आता शिंदे गटाकडे असली तरी भाजप हा मतदारसंघ सोडण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे इच्छुकांनी मतदारसंघ बांधणे व जनसंपर्क अखंडित सुरू ठेवला आहे.
कुणाल राऊत यांनी दोन महिन्यांपासून मतदारसंघात गावोगावी दौरे सुरू केले. ईएसआयसी रुग्णालयासाठी त्यांनी गुरुवारी मोठे आंदोलन केले. यानंतर त्यांनी केलेल्या दाव्यामुळे ठाकरे गटातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली. ‘रामटेक मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिलेला आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा व तशी तयारी आहे. आतापर्यंत आम्ही येथे निवडणूक लढलो. त्यामुळे हा मतदारसंघ सोडणार नाही’, अशी रोखठोक भूमिका कुणाल राऊत यांनी व्यक्त केली.
पन्नास टक्के तरुणांना संधी!
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यभरातील तरुणांचे दोन हजारांहून अधिक अर्ज आले. ५० टक्के तरुणांना संधी देण्याची तयारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दर्शवली आहे. ‘दोन महिन्यांपासून प्रत्येक तालुक्याच्या गावात फिरत आहे. सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. लोकांचे प्रश्नही सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी मतदारसंघात येण्याची साद घातली आहे’, असा दावाही कुणाल राऊत यांनी केला.
