ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महापालिका निवडणुका होऊ शकतात, असं मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जुलै महिन्यामध्ये सुनावणी होऊन ऑगस्टमध्ये निकाल येऊन साधारण ऑक्टोबरमध्ये निवडणूक होतील असा अंदाज मी व्यक्त केलेला आहे. लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या वेळीच होतील विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या होतील. लोकसभेच्या निवडणुका मोदींचे नेतृत्वाखाली आम्ही प्रचंड मतांनी निवडून येऊ त्यानंतर अधिकच काम करून आम्ही विधानसभेमध्ये निवडणुका जिंकू, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या ‘घर चलो’ या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार फडणवीस बोलत होते.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गत नऊ वर्षांचा कार्यकाळ हा विकास पर्वाचा काळ राहिला आहे. त्यामुळे माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहचवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले. तसेच कर्नाटकच्या विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही यावेळी विरोधकांना लगावला.
आज कर्नाटक निवडणुकीतील विजयावर विरोधक आनंदोत्सव साजरा करत आहेत. बेगानी शादी में अब्दुल दिवाना अशी स्थिती आहे. आज विरोधकांनी कितीही आनंदोत्सव साजरा केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये २८ पैकी २५ जागांवर भारतीय जनता पक्ष नक्कीच विजय होईल. वास्तविक, विरोधकांनी आत्मचिंतन केले पाहिजे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत अर्धा टक्का ही मतं मिळू शकली नाहीत. असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.
‘घरी बसावं लागलं असतं तरी चाललं असतं पण उपमुख्यमंत्री करत पक्षाने सन्मान केला’
२०१९ ला जनतेने आपल्याला निवडून दिले, युतीला १७० जागा दिल्या. त्यावेळेच्या शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी विचार सोडला. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी आपली साथ सोडली. महाराष्ट्रात महावसुली सरकार आलं पण आम्ही अडीच वर्ष संघर्ष केला. ज्या सरकारचे मंत्री अधिकारी जेल मध्ये गेले. कोविडच्या काळातील भ्रष्टाचाराच्या कथा तर खूप सुरस आहेत. त्यामुळे हे अशाप्रकारचं सरकार घालवणं गरजेचेच होतं. मात्र, जे आपल्या सोबत युतीत निवडणून आले बाळासाहेबांच्या विचाराचे खरे पाईक एकनाथ शिंदे आपल्या सोबत आले आणि आपलं सरकार पुन्हा सत्तेत आले,असं फडणवीस यांनी म्हटले. तर, पदापेक्षा विचार महत्वाचा असतो, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये भगव्याच्या विचार पायदळी तुडवला जात होता. भगव्याचा विचार वाचवण्यासाठी मला घरी बसावं लागलं असत तरी चालले असते. माझा तर पक्षाने उपमुख्यमंत्री करून सन्मानच केला आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.