• Sun. Mar 15th, 2026

    सुप्रीम कोर्टाचा निकाल लागताच भाजपचा नवा प्लॅन; अजित पवारांवर नजर, मंत्रिमंडळ विस्तार उरकणार

    सुप्रीम कोर्टाचा निकाल लागताच भाजपचा नवा प्लॅन; अजित पवारांवर नजर, मंत्रिमंडळ विस्तार उरकणार

    म. टा विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला अभय दिले असले, तरी महाराष्ट्रातील पक्षविस्ताराचे व इन्कमिंगचे प्रयत्न थांबविण्याचा कोणताही विचार भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व करण्याची सुतराम शक्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह इतर पक्षांतील अस्वस्थ नेत्यांकडे दिल्लीचे बारीक लक्ष कायम राहील, असे पक्षसूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले.

    निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील आठवडाभरात दिल्लीत येऊन गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊ शकतात, असे समजते. फडणवीस यांनाही आवश्यकता भासल्यास दिल्लीत बोलावून पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल, असे पक्षसूत्रांनी सांगितले. मात्र शिंदे यांना त्यांच्याच शब्दांतील ‘महाशक्ती’ची भेट दिल्ली वारीत मिळेल का, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. सत्तासंघर्षाच्या निकालावर भाजप नेतृत्वाचे अत्यंत बारीक लक्ष होते. या निकालाचे विश्लेषण करण्यासाठी व राज्य नेतृत्वाला आवश्यक तो सल्ला देण्यास भाजपच्या कायदा सेलची टीम सज्ज होती. निकाल वाचन सुरू होते, तेव्हा भाजपच्या पहिल्या फळीतील सारे नेते तो अत्यंत बारकाईने पाहत व ऐकत होते, अशीही माहिती समोर आली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सारी ताकद लावणार असून २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही भाजप नेतृत्व या निकालाकडे पाहत आहे, असेही सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशाच्या खालोखाल अधिक खासदार (४८) संसदेत पाठविणारा व देशाच्या अर्थकारणाची राजधानी मुंबई असलेला महाराष्ट्र भाजप नेतृत्वासाठी कायम महत्त्वाच्या स्थानावर होते, आहे व राहणार असे सांगून भाजप सूत्रांनी प्राधान्यता स्पष्ट केली.

    Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंसाठी राजीनामा फलदायीच, निकटच्या वर्तुळातील नेत्याने मांडली थिअरी

    सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यावर शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार, हे खरे असले तरी भाजप नेतृत्वाने महाराष्ट्र हा विषय नजरेआड केलेला नाही. अन्य पक्षांतून येऊ इच्छिणाऱ्यांसाठी भाजपचे दरवाजे कायम खुले राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर त्या पक्षात तूर्त जे झाले ते पॅचवर्क आहे. त्यामुळे अजित पवार व इतर पक्षांतील अस्वस्थ नेत्यांबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रयत्न सुरूच ठेवण्याचे धोरण कायम ठेवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

    Supreme Court Verdict: निकाल विरोधात गेला पण उद्धव ठाकरेंचा फायदा होणार, जाणून घ्या नक्की काय घडलं?

    मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध

    राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने सरकार कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्ताराच्या निकालाकडे लक्ष आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात साधारण १५ ते १९ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, असे बोलले जात आहे. राज्य सरकारच्या सध्याच्या मंत्रीमंडळात एकूण २० मंत्री आहेत. यात आणखी १५ ते १९ मंत्र्यांची भर घालण्यात येणार असून, त्यानंतर नव्याने खातेवाटप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नव्या मंत्र्यांची भर पडल्यानंतर पालकमंत्र्यांच्या यादीतही बरेच बदल केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदासाठी वाट पाहणाऱ्या शिवसेना, भाजपतील अनेक आमदारांनी गुरुवारपासून लॉबिंग सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्तार कधी होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    भाजप आमदाराच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात अजितदादा-फडणवीस एकाच सोफ्यावर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed