• Sat. Sep 21st, 2024

आरपारची लढाई होऊन जाऊ दे, जनताच आपला फैसला करेल; उद्धव ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांना ओपन चॅलेंज

आरपारची लढाई होऊन जाऊ दे, जनताच आपला फैसला करेल; उद्धव ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांना ओपन चॅलेंज

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारची अवहेलना झाली आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांवरुन सिद्ध झाले. शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे जीवनदान तात्पुरते आहे. त्यामुळे या बेकायदेशीर सरकारने नैतिकतेला जागत राजीनामा दिला पाहिजे. एवढे सगळे धिंडवडे निघाल्यानंतर आपण सगळे निवडणुकीला सामोरे जाऊयात. सर्वात शेवटचे न्यायालय हे जनतेचे आहे. त्यामुळे आपण हा फैसला जनतेवर सोपवुयात, जनता देईल तो कौल आपण स्वीकारू, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा एकदा निवडणूक घेण्याचे आव्हान दिले.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजपच्या गोटात नव्या हालचाली; अजित पवारांवर नजर, मंत्रिमंडळ विस्तार उरकणार

उद्धव ठाकरे हे शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बेबंदशाहीवर परखडपणे भाष्य केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपूत्रांच्या हक्कांसाठी जी शिवसेना जोपासली ती गद्दारांच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट उघडा पाडला. यानिमित्ताने भाजपचा हिंदुत्त्वाच्या बुरख्याखाली दडलेला खरा चेहरा समोर आल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंसाठी राजीनामा फलदायीच, निकटच्या वर्तुळातील नेत्याने मांडली थिअरी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ठाकरेंचा इशारा

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही खडे बोल सुनावले. महाराष्ट्रात सुरु असलेल्या घटनांमुळे जगभरात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना चाप लावावा. हिंदुत्वात नैतिकतेला महत्त्व आहे. विधानसभा अध्यक्ष त्यांच्यापरीने निर्णय घेतली. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी चौकट आखून दिली आहे. त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल. अध्यक्षांनी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप असा प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून पक्षांतर करण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी काही उलटसुलटं किंवा वेडवाकडं केलं तर आम्ही निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तशीच पुन्हा न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed