सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे आणि यात्रा कमिटीचे आजीवन अध्यक्ष असणाऱ्या पवार यांच्या अपघाती मृत्यूने वेळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि चार वर्षांची मुलगी असं कुटुंब आहे.
अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अभ्यास स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनधारकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस पुढील तपास करत आहेत.
वेळे हे गाव महामार्गावरच असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय आहेत. त्यामुळे वाहनधारकही मोठ्या प्रमाणात तिथे थांबत असतात. मात्र ही वाहनं महामार्गावरच पार्क केल्यामुळे अपघाताला नेहमीच आमंत्रण मिळत असतं. तसंच वेळे नागरिकांची शेतीदेखील महामार्गालगतच असल्याने त्यांना नियमित ये-जा करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन उड्डाणपूल बांधण्यासाठी वेळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीतर्फे महामार्ग प्राधिकरणाला अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत चालली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.