• Sun. Sep 22nd, 2024

सावधान! मिठी नदीच्या पुराचा धोका कायम; दीड हजार कुटुंबांना पावसाची भीती

सावधान! मिठी नदीच्या पुराचा धोका कायम; दीड हजार कुटुंबांना पावसाची भीती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मिठी नदीच्या महापुराला अठरा वर्षे उलटूनही पुराचा धोका अद्याप कायम आहे. जोरदार पावसात पाणी साठणाऱ्या क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील दीड हजार कुटुंबांचे स्थलांतर गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. दरवर्षी मुसळधार पावसात मिठी नदीला पुराचा धोका कायम असल्याने येथील नागरिक स्थलांतराच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पुनर्वसनाचा पेच अजूनही सुटलेला नाही.मिठी नदीच्या परिसरात क्रांतीनगर आणि संदेशनगर या दोन झोपडपट्ट्या मागील अनेक वर्षांपासून वसलेल्या आहेत. २६ जुलै, २००५मध्ये झालेल्या महाप्रलयात येथील झोपडपट्ट्या पुराच्या पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे पावसाळा जवळ आला, की येथील रहिवाशांना धडकी भरते. पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून मिठी नदीची सफाई करते. यंदा आत्तापर्यंत नदीची सुमारे ५० टक्के सफाई झाली असून, येत्या ३१ मेपर्यंत आणखी ५० टक्के सफाई पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. ही सफाई व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण न झाल्यास नदीला पावसाळ्यात पुराचा धोका आहे.

या पार्श्वभूमीवर नदी परिसरातील रहिवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. येथील १६५० झोपड्यांना नदीचा धोका आहे. दरवर्षीच्या पावसात नदीला पूर आल्यानंतर पहिला फटका क्रांतीनगर व संदेशनगरमधील झोपडपट्ट्यांना बसतो. त्यामुळे वने आणि महसूल विभाग तसेच मुंबई महापालिका या यंत्रणा मिठीलगतच्या झोपडपट्ट्यांना धोक्याचा इशारा देतात. जोरदार पावसात मिठी नदीला पूर येण्याच्या शक्यतेने आधीच येथील स्थानिकांचे लगतच्या पालिकेच्या शाळेत सुरक्षित स्थलांतरीत केले जाते. मात्र ही तात्पुरती व्यवस्था असल्याने काही दिवसांनंतर पावसाळ्यात पुन्हा पुराच्या धोक्याची टांगती तलवार कायम राहते. त्यामुळे कायमस्वरूपी पुनर्वसन हाच उपाय असून, स्थानिकांचीही स्थलांतरीत होण्याची तयारी आहे. मात्र सरकारी लाल फितीच्या कारभारात हे स्थलांतर रखडले आहे.

प्रीमिअर कॉलनीचा पर्याय

‘क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील २४० कुटुंबांचे पुनर्वसन कुर्ला प्रीमिअर कॉलनीत करण्यात आले आहे. आणखी १४०० कुटुंबांचे स्थलांतर याच कॉलनीत केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या जूनमध्ये हे स्थलांतर होण्याची शक्यता आहे’, अशी माहिती चांदिवलीतील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले. मात्र, ‘सरकारी दिरंगाईमुळे स्थलांतर रखडल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पावसाळा आला, की रात्र जागून काढतो. त्यामुळे लवकरात लवकर पुनर्वसन करावे’, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed