या पार्श्वभूमीवर नदी परिसरातील रहिवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. येथील १६५० झोपड्यांना नदीचा धोका आहे. दरवर्षीच्या पावसात नदीला पूर आल्यानंतर पहिला फटका क्रांतीनगर व संदेशनगरमधील झोपडपट्ट्यांना बसतो. त्यामुळे वने आणि महसूल विभाग तसेच मुंबई महापालिका या यंत्रणा मिठीलगतच्या झोपडपट्ट्यांना धोक्याचा इशारा देतात. जोरदार पावसात मिठी नदीला पूर येण्याच्या शक्यतेने आधीच येथील स्थानिकांचे लगतच्या पालिकेच्या शाळेत सुरक्षित स्थलांतरीत केले जाते. मात्र ही तात्पुरती व्यवस्था असल्याने काही दिवसांनंतर पावसाळ्यात पुन्हा पुराच्या धोक्याची टांगती तलवार कायम राहते. त्यामुळे कायमस्वरूपी पुनर्वसन हाच उपाय असून, स्थानिकांचीही स्थलांतरीत होण्याची तयारी आहे. मात्र सरकारी लाल फितीच्या कारभारात हे स्थलांतर रखडले आहे.
प्रीमिअर कॉलनीचा पर्याय
‘क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील २४० कुटुंबांचे पुनर्वसन कुर्ला प्रीमिअर कॉलनीत करण्यात आले आहे. आणखी १४०० कुटुंबांचे स्थलांतर याच कॉलनीत केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या जूनमध्ये हे स्थलांतर होण्याची शक्यता आहे’, अशी माहिती चांदिवलीतील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले. मात्र, ‘सरकारी दिरंगाईमुळे स्थलांतर रखडल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पावसाळा आला, की रात्र जागून काढतो. त्यामुळे लवकरात लवकर पुनर्वसन करावे’, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.